पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनातील दैनंदिन घडणाऱ्या घटनांचे इतक्या बारकाव्याने निरीक्षण केले व कृतीत उतरविले याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या जीवनाशी राजा किती समरस झाला होता हे या पत्रावरून फार चांगल्या प्रकारे ध्यानात येते.

 केवळ आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांची राजा काळजी घेत होता असे नाही. तर परमुलुखात जात असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाची तो अतिशय काटेकोरपणे काळजी घेत असे. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडे शिवाजी राजा निघाले असतांना आपल्या सैन्याला त्याने ताकिद दिली की, "एक काडी रयतेची घेऊ नये, आवश्यक त्या वस्तू बाजारातून विकत घ्याव्यात. कोणीही लुट करू नये. या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करावे." ऐतिहासिक दाखल्यावरून असे दिसून येते की, या आज्ञेचे उल्लंघन झाले तर राजाने शिरच्छेदाची शिक्षा करून जबर बसविली. परमुलुखात राहणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा शिवाजी राजा हा सबंध भारतवर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव आहे.

 जसवंतराव पालवणकर यांची जहागिरी शिवाजीराजाने ताब्यात घेतली. राजाने या मुलखाची नीट व्यवस्था लावताना स्वाऱ्यांमुळे घाबरून त्या प्रांतातून पळून गेलेल्या प्रजेला परत बोलावले. सर्वांना विश्वासपूर्वक कौल दिला. पाहता पाहता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ब शूद्र, कासार, सोनार, न्हावी, तमासगीर, माळी, कुंभार, कारवार, कोष्टी, शिंपी, रंगारी, डोंबारी, तेली, परीट इत्यादी अठरा पगड जातीचे लोक पुन्हा नांदते केले आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या छायेखाली लोक नांदू लागले आणि दिवसेंदिवस होणारी भरभराट पाहून राजा आनंदीत झाला. याचा दाखला शिवभारतकार कवी परमानंद यांनी दिला आहे.

 शिवाजी राजे आपल्या सैनिकांना एका आज्ञापत्रात आदेश देताना म्हणतो, आपल्या वागणुकिने रयतेला त्रास होता कामा नये. या गोष्टीची कडक शब्दात राजा ताकिद ते देतो, तो येणेप्रमाणे:-

 "कसबे चिपळूणी साहेबी लष्कराची बिले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही. म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ऐसियास चिपळूणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयांत पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता. तो कितेक खर्च होऊन गेला व चिपळून आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली. परंतु जरूर झाले, त्याकरिता कारकुनाकडून व गडोकडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास (माने)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ७२