पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पराभव त्याला करता आला नसता. (मिर्झराजेचा मृत्यू २८ ऑगस्ट १६६७). या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर राजा कायम झुंजत राहू शकला असता. पण राजाचा जीव किल्ल्यांच्या भिंतीमध्ये, बुरुजामध्ये अडकला नव्हता. किल्ल्यांच्या संख्येत नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखी संसारत त्याचे सुख सामावलेले होते. त्यामुळेच अखेरीस १२ जून १६६५ रोजी राजाने शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली व रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. राजाच्या शरणागतीचा एवढाच तर्कशुद्ध अर्थ लागू शकतो. ३१ मार्च ते १२ जून हा ७३ दिवसांचा काळ मिर्झाराजेला गड जिंकण्यासाठी लागला. यावरून अगदी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा राजाचे सैन्य चिवटपणे झुंज देत होते हे कळते. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. १२ जून ही तारीखही महत्वाची आहे. हे आगोठीचे दिवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्चक्री थांबली नाही आणि शेतकऱ्यांची सबंध शेती जर तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे (सन.१६२८-३०) रयतेची अन्नानदशा होईल ही भीती आ वासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर त्या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली. म्हणजे राजाचा हेतू साध्य झाला. त्याला शेती व शेतकरी यांच्याबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे हे अत्यंत जिवंत आणि बोलके उदाहरण आहे.

 अफझलस्वारी ते पुरंदरचा तह या काळाचा लष्करी अर्थ देशातील इतर सत्तांना एक नवे राज्य उभे रहते आहे याची जाणीव होणे आणि ते नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न करणे. तर शेतकरी रयतेच्या दृष्टीने अर्थ असा की, त्यांना हवे असलेले राजकीय स्थित्यंतर घडून येणे. हा बदल प्रजेला हवासा वाटत होता हे प्रजेने आणि सामान्य माणसातून उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या शिपायांनी दाखवून दिले. शाहिस्तेखानाविरुद्धच्या गनिमी युद्धात दाखवून दिले. शिवाजीराजा आग्ऱ्याला गेला असता तिथे अडकून पडला असताना राज्य सुरक्षित राखून दाखवून दिले.

 हे रणांगणावर घडलेले उदाहरण म्हणजे काही अखेरचा पुरावा नाही. पण युद्धप्रसंग सोडून अगदी रोजमुऱ्याच्या जीवनात राजा शेतीची व शेतकऱ्यांची जातीने काळजी घेत होता.

 या संदर्भात राजाने प्रभावळीचे रामाजी अनंत सुभेदार यांना लिहिलेले पत्र आताच्या तथाकथित राज्यकर्त्याच्यासुद्धा डोळ्यांत अंजन घालेल इतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे.

 "साहेब मेहरबान होऊन सुभात फर्माविला आहे. ऐसियास चोरी न करावी,

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ६९