पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोणीचे काळभोर खानाला जाऊन मिळाल्याचा आणि घरदार वाचवल्याचे सांगितले असेल बरेच काही झाले असेल, पण एक नक्कि. सगळ्यांनी मिळून ठरवले असेल की लढायला येतंय, हत्यारं-पात्यारं आहेत त्यांनी किल्ल्यात जायचं, जमेल तेवढा दाणागोटा किल्यातल्या लढणाऱ्या लोकांना ठेवायचा, जमेल तेवढा घेऊन डोंगरात भीमाशंकराकडे निघून जायचं. पण मागं काही शिल्लक ठेवायचं नाही, जाळून टाकायचं. आपल्या मुलखावर, आपल्यावर चालून येणाऱ्याला मदत करायची नाही

 शिवाजीराजाने पन्हाळ्यातून निसटून परत आल्यावरही गनिमी काव्यानेच शाहिस्तेखानाशी लढा चालू ठेवला. अगदी मोजक्या माणसांनिशी प्रचंड फौजेने वेढलेल्या खानावरच घातलेला यशस्वी छापा अनेक गोष्टी सांगतो. मोगलांचा बेशिस्त अनागोंदी कारभार, त्याचा अचूक फायदा उठवून नियोजनबद्ध साहस करण्याचे राजाचे धैर्य, बरोबरीच्या माणसांची निष्ठा, बलिदानाची तयारी तर सांगतोच, पण खानाच्या मोठ्या डेऱ्यामध्ये काम करणाऱ्या पुणे प्रांतातल्या सामान्य माणसांची सहानुभूती, मदत कदाचित नियोजनातील साहाय्य याही गोष्टी सांगतो.

 शाहिस्तेखानाच्या आक्रमणाच्या धामधुमीतही शिवाजीराजास गोरगरीब शेतकऱ्यांची, रयतेची चिंता किती होती हे एका पत्रावरून समजते. मोगल सैनिक जेध्यांच्या भागात हिरडस मावळात घुसून जाळपोळ, लुटालूट करतील अशी शक्यता दिसताच राजाने हे पत्र बाजी सर्जेराव जेध्यांच्या लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाच्या छाप्याच्या सुमारे सहा महिने आधी हे पत्र लिहिले आहे. पत्रात शिवाजीराजा लिहिता, "पत्र मिळताच गावागावात ताकिद करून लेकरेबाळे तमाम रयत घाटाखाली शत्रूचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी पाठवावी. हयगय करू नये. असे न केल्यास मोगलांनी माणसे धरुन नेल्यास, त्रास दिल्यास त्याचे पाप तुमच्या डोक्यावर बसेल म्हणून रात्रीचा दिवस करून माणसे हलवा. तुम्ही आपल्या माणसांसह हुशारीत राहा. शेतीवाडीचे राखण करायला जी माणसं राहतील त्यांनाही हुशार राहायला सांगा, डोंगरावर अवघड जागी आसरा घेऊन रहा. गनिम दुरून नजरेस येताच त्याच्या वाटा चुकवून पळून जा असे सांगा. तुम्ही तुमच्या जागी तयारीत राहा."

 शेतकऱ्यांची शेतीची अशी ससेहोलपट होत असतानाच याच शेतकऱ्याच्या घरची माणसे महाराजांच्या सैन्यात असल्याने व सैन्याची मुलूखगिरी चालू असल्याने शेतकऱ्यांचे घरी तगून राहता येईल एवढे धान्य नक्कद्दच पोहोचत असावे.

 मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणात स्वराज्याच्या रयतेचे असेच हाल झाले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ६५