पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुण्यात टाकलेल्या प्रचंड तळाला धान्यधुन्य, दाणा वैरण आणि गाई गुरे पुरवण्याची. राजाच्या रयतेवर सैन्याचा रगाडा सुरू झाला पण रयत खचलेली दिसत नाही जागोजाग कोणत्याही प्रमुख सेनानायकाच्या आज्ञेविना आणि अनुपस्थितीत खानच्या सैन्यावर गनिमी हल्ले झाले. गनिमी काव्याला अनुकूल असलेला समाज-सर्वसामान्य रयत जमेल तेवढी लढू लागली. जमेल तेव्हा असहकारही रयतेने खानाविरुद्ध पुकारलेला दिसतो. खान पुण्यात पोहोचेपर्यंत त्याला तीनचार ठिकाणी मराठ्यांच्या हल्ल्याची चुणूक अनुभवावी लागली. तर पुण्याला पोहोचताच बातमी आली की पुण्याच्या उत्तरेच्या भागातील सर्व धान्याचे साठे, वैरण लोकांनी जाळून टाकली आहे. राजावर चालून येणाऱ्या सैन्याचे आमचे धान्यधुन्य लुटून नेण्यापेक्षा आम्हीच ते जाळून टाकू अशी भावना लोकांनी दाखविली. एकिकडे "लोकयुद्धाची” चुणूक मावळे मोगलांना दाखवत होते तर दुसरीकडे राजाच्या आजोळचा माणूस जाधवराव सुपे कऱ्हे पठारातील शेतकऱ्यांना लुटून खानाच्या छावणीला रसद पाठवत होता.
 यातच एक चाकणच्या परिसरात घडलेला छोटा प्रसंग आहे. शाहिस्तखानाने चाकणाचा किल्ला काबीज करायचे ठरविले. खानाचे सैन्य चाकणला पोहोचण्याच्या आतच चाकण-चौऱ्याऐंशीतील शेतकरी जमेल तेवढे धान्य-धुन्य घेऊन उरले सुरले जाळून खाक करून निघून गेले.

 खरोखर कसा घेतला असेल हा निर्णय त्यांनी? एकतर खान चालून येणार ही बातमी चाकण परिसरात आधीच पोहोचली असली पाहिजे. त्यात राजा पन्हाळ्याला अडकला आहे. सैन्य कोठे आहे माहीत नाही. इथे असलेले सैन्य रयतेचे रक्षण करायला पुरेसे नाही हे दिसत असेल, कदाचित चाकणच्या किल्लेदाराने फिरंगोजी नरसाळ्याने सांगितलेही असेल. कदाचित गावोगावची मंडळी घाईघाईने आळंदीसारख्या ठिकाणी एकत्र जमली असतील. कुणीतरी कऱ्हेपठाराहून पूर्ण नागवला गेलेला एखादा शेतकरी नातेवाईकांकडे जाऊन राहावे म्हणून चाकणला आला असेल. त्याने कऱ्हेपठाराची दुर्दशा सर्वांना सांगितली असेल. कुणी जुन्या माणसानं कशाला या मोठ्या लोकांच्या भांडणात पडता, आपण गरीब हकनाक मरू, गोडीगुलाबीने घ्या. मागे शहाजीराजाच्या वेळी पार घरादारावर गाढवाचे नांगर फिरले त्याची आठवण दिली असेल.लगेच कुणीतरी दादोजीपंतामुळे शिवाजीराजामुळे सुखात शेतीभाती तरी करता यायला लागली, आता राजाची पाठ सोडायची नाही असे म्हटले असेल. कुणी आपला राजा देवाचा माणूस आहे, त्याशिवाय का अफझलखानासारखा राक्षस त्याने मारला असे म्हटले असेल. कुणी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ६४