पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घुसणार हेही स्पष्टच होते. पागा आणि त्यातले घोडे जगवायचे म्हणजे धान्य-धुन्य दाणा-वैरण दूध-दुभते खाण्यासाठी गाई-बैल लागणार आणि ती शेतकऱ्यांकडूनच लुटली जाणार हे स्पष्ट दिसत होते. शिवाजीराजा राजगड सोडून प्रतापगडावर तळ देऊन राहिला. खानाने तुळजाभवानी तोड, पंढरपूरवर चालून जा असे प्रकार केले. स्वत:च्या सैन्यात निदान आठदहा मोठे मराठा सरदार असतानाही केले. शिवाजीराजा चिडून डोंगरातून मैदानात यावा म्हणून सर्व हिकमती झाल्या. राजाने संयम राखला. अफझलखानाला सैन्याचा रगाडा स्वत:च्याच जहागिरीतून, वाई प्रांतातून प्रतापगडच्या दिशेने न्यावा लागला.

 रयतेने शत्रूला मदत केल्यास रयतेचे हाल करणे हे सुलतानी राज्यात होतेच. पुढे राजाने सिधुदुर्ग बसवायला घेतला तेव्हा भूमीपूजनाचे मंत्र सांगायला येणारा ब्राह्मण सुरूवातीला येईना. तो म्हणाला, आज मंत्र सांगितले आणि उद्या या प्रांती बादशहाचे सुभेदार आले तर शिवाजीला याच बामणानी कील्ला बांधायला मंत्र सांगून मदत केली असे म्हणून पकडतील, मारतील, हाल करतील. ही बादशही रीत होती.

 अशा प्रकारचा रयतेवर सूड उगवला जाण्याचा प्रसंग राजाने टाळला. अफझल- सैन्याच्या रसदीसाठी स्वराज्याला तोशीस झाली नाही. तोशीस पडली असेल तर अफझलच्याच वाई प्रांताच्या रयतेला. कदाचित त्यांनी शिव्याशाप घातले असतील आणि नंतर खानाला मारल्यावर राजाने वाई प्रांत हस्तगत केल्यावर तिकडच्या शेतकऱ्यांनी शिवाजीराजाचे स्वागतच केले असेल.

 दिल्लीश्वर औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या अफझलखानाचा वध केल्यानंतर साहजिकच राजाला अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झाले. त्या काळीही देशातल्या कानाकोपऱ्यात अशा बातम्या जात होत्याच. शाहिस्तेखान महाराष्ट्रातून अपमानित होऊन आसाम-बंगालच्या सुभेदारीवर गेला तेव्हा तेथील स्थानिक राजाने "शाहिस्तेखान म्हणजे शिवाजीने ज्याची बोटे तोडली तो तूच काय" असे त्याला विचारल्याचा उल्लेख-आसामी बखरीत-बुरंजीत आहे. त्यामुळे अफझलवधानंतर दिल्लीश्वरांची स्वारी महाराष्ट्रावर येणे अटळ होते. ती वेळ साधून आली. राजा सिद्दी जौहरच्या पन्हाळा वेढ्यात अडकला असताना आली. बरोबर जवळजवळ एक लाखाचा फौजफाटा घेऊन आली. ही फौज मार्च १६६० ते एप्रिल १६६३ एवढा प्रदीर्घ काळ स्वराज्यात पुणे प्रांतात होती. हा सर्व काळ आणि पुढे जयसिंग-दिलेरखान स्वारीचा काळ हा रयतेने राजासाठी जे-जे सोसले त्याचा साक्षी आहे.

 स्वराज्यात घुसताच त्याने सुपे काबीज करून जाधवराव या सरदाराला तेथे ठेवले आणि स्वत: पुण्याला गेला. जाधवरावावर जबाबदारी होती ती खानाने

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ६३