पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राज्यात दादोजी कोंडदेवाने घालून दिलेली व्यवस्था लावणे, कोंढवा, शिवापूर येथील धरणे बांधणे अशीही कामे चालू होती.

 १६५६ चे अफझलखानाचे आक्रमण, सिद्दी जोहार आणि शाहिस्तेखानाबरोबरची लढाई, मिर्झा राजाचे आक्रमण हा खरे तर रयतेचे अतोनात हाल होण्याचा काळ. कायमच्या लष्करी हालचालीमुळे शिवाजीराजाला रयतेच्या कामात स्वत:लक्ष घालण्याला वेळ मिळालेलाच दिसत नाही.पण स्वत:च्या राज्याचा सुखद अनुभव घेतलेली प्रजा या सर्व काळात स्वराज्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. शिवाजीराजाच्या बाजूने लढायलाच काय, मरायची खात्री असताना बलिदानालाही लोक उभे राहिले. अफझलखानाच्या वेळी वतनावर पाणी सोडायची जेध्यांनी तयारी दाखविली. काही खोपड्यांसारखे अपवाद वगळता मावळातील देशमुख उभे राहिले. या राज्यात एक शिक्का दरबारातून उठवून आणून रयतेला लुबाडायची सोय नाही हे माहीत असूनही देशमुख मंडळी राजाच्या बाजूने उभी राहिली. यातीलच काही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील धारकरी परक्या मुलूखात, कोल्हापूर जिल्ह्यातील अंधाऱ्या राक्षसी पावसात, जळवांचा आणि रानगव्यांचा त्रास असणाऱ्या परिसरात घोडखिंडीत स्वत: मरण्याची खात्री असताना लढायला उभे राहिले, मेले. नवजात स्वराज्याचा नाश होऊ नये म्हणून; शेतकऱ्यांचा राजा जिवंत राहावा म्हणून.

 अफझलखानाची स्वारी ही अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. एकतर प्रथमच प्रचंड मोठी बावीस हजारांची फौज चालून येणार होती. अफझलसारखा सेनापती नेमला गेला होता. तो सामान्य सेनापती नव्हता. दिल्लीचा राजपुत्र औरंगजेबाची विजापूरकरांवरची स्वारी त्याने रोखली होती. औरंगजेबाला कैद करण्याइतकी परिस्थिती निर्माण केली होती त्यामुळे अफझलखान चालून येणे हीच मुळी स्वराज्याच्या वाढत्या सामर्थ्याची पावती होती. अफझलखानाची जहागीर सुपीक अशा वाई प्रदेशाची. वाई प्रदेशांत शेतीभाती नीट चालावी आणि वसूल व्यवस्थित गोळा होऊन खानाकडे पोचता व्हावा याची जो काळजी घ्यायचा. या जहागिरीच्या उत्तरेलाच जेधे-बांदल मंडळींचा-राजांच्या अंगद हनुमानाचा प्रदेश. वाई प्रातांच्या पश्चिमेला जावळी, तीही शिवाजीराजाने काबीज केलेली होती. वाई प्रांत आज ना उद्या राजा घेणार ही शक्यता होतीच. खानाला वाई प्रांत हातचा जाऊ द्यावयाचा नसावाच. त्यात भोसल्याबद्दल या खानाला द्वेशबुद्धी होती आणि जावळीवर त्याचा पूर्वीपासूनच डोळा होता. राजानेही हे ओळखले होते. शिवाजीराजा स्वत: सिंहगड, राजगड परिसरात राहता तर बावीस हजार फौजेचा रगाडा स्वराज्याच्या रयतेत

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ६२