पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वराज्याच्या सैनिकांची भूमिकाच वेगळी असते. राज्य स्थापण्याकरिता, सैन्याकरिता साधनांची गरज असतेच. ती साधने सर्वसामान्य जनतेकडूनच मिळवायची असतात. पण त्यासाठी अत्याचारांचा वापर त्यांना परवडूच शकत नाही. सर्वसामान्य लोकांतून, गावागावांतून, दऱ्याखोऱ्यातून पाण्यातील माशाप्रमाणे सहज संचार करणे त्यांना आवश्यक असते. धनधान्य मिळविणे हे त्यांचे साधन असते, साध्य नाही. ज्या प्रदेशात त्यांचा संचार त्याच प्रदेशात त्यांना सुव्यवस्थित समाज आणि प्रशासन तयार करायचे असते. आणि शेवटी आसपासची सगळी माणसे ही त्यांची आपली, जवळची, लागेबांध्याची अशी असतात. अशा परिस्थितीत स्त्रियांवरील अत्याचार संभवतच नाहीत.

 राजाच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा कोण्या व्यक्तीच्या महात्म्याचा प्रश्न नाही.असे माहात्म्य आणि चारित्र्य शिवाजीकडे होते म्हणूनच तो अशा स्वातंत्र्यसेनेचा नेता बनू शकला. स्वराज्याच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन एवढेच सिद्ध करतो की ही काही लुटारूंची फौज नव्हती; आपल्याच देशातील सर्वसामान्य कुटुंबवत्सल माणसे लुटीचा प्रतिकार करून निर्भयपणे जगता यावे यासाठी हातात तलवार घेऊन लुटारूंच्या विरुद्ध उभी ठाकली होती.

 वस्तुनिष्ठ दृष्टीने राजाच्या सर्व चरित्राचा अभ्यास केला तर तो हिंदूंच्या रक्षणासाठी लढला किंवा मुसलमानांना बुडविण्यासाठी लढला असे म्हणण्याला काहीही आधार सापडत नाही. गावगाड्याच्या व्यवस्थेची लूट करणाऱ्या सर्व पुंडांविरुद्ध तो लढला. मग त्यांचा धर्म हिंदू असो का मुसलमान; कॅथॉलिक असो का प्रॉटेस्टंट. त्याच्या सहकाऱ्यांत हिंदू होते, मुसलमान होते. मुसलमानांशी लढायांनी शिवाजीला जितके थकवले तितके भाईबंदांतील लढायांनी त्याला जेरीस आणले. शिवाजीने मांडलेला संघर्ष हा धर्माधर्मातील नव्हता. एका बाजूला गावगाडा आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्याला लुटणारे अशी संघर्ष रेषा त्याने आखली. राजकारण आणि राज्यसत्ता शेतीच्या लुटारूंच्या हातून काढून काढून घेऊन ती गावगाड्याच्या दृष्टीने कल्याणकारी बनावी असा प्रयत्न केला. शिवकालीन स्वराज्य आणि मोगलाई म्हणजे १७ व्या शतकातील भारत व इंडिया यांचेच रूप होते.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ५७