पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्धवेळ सैनिक होता. जे पूर्णवेळ सैनिक झाले त्यांचेही शेतीशी आतड्याचे नाते सुटलेले नव्हते, कुटुंबवत्सलता संपलेली नव्हती. जमिनीशी नाते असणारे सैन्यच काय पण दंगेखोरसुद्धा स्त्रियांवर हात उचलीत नाहीत. म. गांधींच्या वधानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या दंगली उसळल्या. पण अगदी अपवादादाखलदेखील स्त्रियांवर अत्याचार घडले नाहीत. याउलट इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसारख्या शहरात झालेल्या दंग्यात महिलांवरील अत्याचाराचे अनेक प्रकार घडले. स्वराज्याचे सैन्य म्हणजे सरदारांच्या फौजांची घडवून आणलेली संधिसाधू आघाडी नव्हती. अशा तऱ्हेची आघाडी घडवून आणून त्यातून स्वराज्य संस्थापना करण्याचा प्रयत्न राजाने केला असता तर त्याला यश आले असते किंवा नाही हा मुद्दा अलाहिदा. पण त्या सैन्याची स्त्रियांबद्दलची वागणूक स्वच्छ ठेवणे शिवाजीराजासारख्या चारित्र्यवान नेत्याच्याही आटोक्याबाहेरचे झाले असते. शहाजीराजांनी लुटारू फौजांची आघाडी बांधली. त्यांच्या सैन्याची स्त्रियांविषयी काही धवल कीर्ती नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

 स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन उदार की अनुदार याचा संबंध सैनिक कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, याच्याशी नाही. औरंगजेबालाही ज्याची वाहवा करावी लागली त्या सैन्याच्या स्वरूपात पुढे फरक पडला. पेशवाईच्या काळात ते उत्तरेकडे, पूर्वेकडे स्वाऱ्या करू लागले. त्यावेळी त्यांच्याही प्रकृतीत मोठा फरक पडला. पावसाळ्याच्या आधी घरी पतरण्याची पद्धत कायम राहिल्यामुळे मराठा फौजांचे स्त्रियांवरील अत्याचार हे मुसलमानी नीचांकापर्यंत कधी गेले नाहीत हे खरे, पण उत्तर पेशवाई तमाशे लावण्याच्या फडांना जो ऊत आला तो पुष्कळ काही सांगून जातो.

 लुटारु फौजांची भूमिकाच वेगळी असतेक लुटीच्या प्रदेशात ज्या गोष्टीवर हात टाकता येईल त्यावर टाकावा, अन्नधान्य लुटावे, गुरे पळवावीत, कापावीत, पुरुषांच्या कत्तली कराव्यात आणि त्याच्या राहिला साहिला अभिमान धुळीत मिळवून प्रतिकाराची सर्वबुद्धी खलास करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांवरही अत्याचार करावेत ही लुटारूंची रणनीती असते. लुटीच्या हल्ल्याचा अनुभव घेतलेले समाजचे समाज नपुंसक होऊन जातात आणि लुटारूंच्या सैतानी राज्यापुढे मान तुकवतात. लुटारूंना नेमके हेच अभिप्रेत असते. लोकांकडून प्रेम मिळविण्याची त्यांची इच्छाही नसते आणि अपेक्षाही नसते. हा अनुभव प्रत्येक युद्धात येतो. सुसंस्कृत जर्मन व जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असेच वागले. अमेरिकन सैनिकांची वर्तणूक व्हिएटनामसारख्या प्रदेशात अशीच राहिली.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ५६