पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बसत असे. विहीरीवर सावकाराच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत असत. त्यांच्या मुलांना तो त्या त्या मोसमातील फळे देत असे. आपण आपल्या आई किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे तो त्या बायकांशी बोलत असे.' असे वर्णन खाफीखानाने केलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळातील बादशहा सुलतानाच्या वागणुकिचे एक ठळक उदाहरण म्हणून अफझलखानाचे देता येईल. फ्रेंच प्रवासी अब्रे कॅरे यानी असे लिहून ठेवले आहे की, शिवाजीवर चालून जाण्यास खान निघाला व आपल्या स्त्रियांचा त्याग करावयाची वेळ आली त्यावेळी त्याचा द्वेषाग्नी एकदा भडकला की त्यास तो आवरता आला नाही व त्या भरातच एक असे अमानुष कृत्य करण्याची प्रेरणा त्याला झाली, जे फक्त उलट्या काळजाचाच मनुष्य करू शकेल. खानाने सात दिवस स्वत:ला जनानखान्यात कोंडून घेतले व हा काळ उपभोग व चैनीत घालवला. पण त्याचा शेवट मात्र करूण झाला. कारण शेवटच्या दिवशी खानाने आपल्या नजरेसमोर त्या दुर्दैवी २०० स्त्रियांना सैनिकांकडून भोसकून ठार मारले. आपल्या माघारी त्या परपुरुषाशी रत होतील या भयाण व काल्पनिक भयाने तो पछाडला गेला होता. त्या बिचाऱ्यांना असा काही प्रसंग घडेल याची कल्पनाही नव्हती.

 स्वराज्याचे सैनिक आणि लुटारूंच्या फौजा यांच्या वर्तणुकित हा फरक कसा काय झाला? बहुतेक इतिहासकारांनी याचे सर्व श्रेय शिवाजीच्या व्यक्तिगत नीतिमत्तेला आणि चारित्र्याला दिले आहे. आणि शिवाजीमध्ये ही आदर्श नैतिकता उद्भवली कोठून तर आई जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या सुसंस्कृत, धर्मपरायण शिकवणीमुळे आणि प्रभावामुळे. लहानपणापासूनच्या शिकवणीमुळे, सुसंस्कृत वातावरणामुळे संबंधित व्यक्तद्दच्या चारित्र्यावर दीर्घकाळ प्रभाव राहू शकेल हे शक्य आहे. पण अशा शिकवणुकीच्या अपघाताने स्वराज्याच्या सैनिकांची नीतिमत्ता ठरली असे म्हणणे तर्काला सोडून होईल.

 सुलतान वतनदारांच्या लुटारू फौजा व स्वराज्याचे सैनिक यांच्या उद्दिष्टात आणि मूलभूत प्रकृतीतच मोठा फरक होता. स्त्रियांविषयीच्या वागणुकितील फरक हा चमत्कार नाही. अपघात नाही. शिवाजीराजाच्या स्वराज्याच्या थोरवीचा तो मोठा सज्जड पुरावा आहे.

 लुटारूंच्या फौजांतील सैनिक कुटुंबवत्सल असू शकत नव्हते. शादीसुदा असणाऱ्यांचेसुद्धा घराशी संबंध जुजबीच असणार. लुटारू फौजा पूर्णवेळ व्यावसायिक सैनिकांच्या असत. साहजिकच लुटीच्या प्रदेशात गेल्यानंतर त्यांची प्रवृत्ती अगदी वेगळी राही. स्वराज्यातला सैनिक हा मुख्यत: अर्धवेळ शेतकरी व

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ५५