पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महिलांशी वर्तणूक पूर्णपणे सभ्यतेची असली पाहिजे याची काळजी घेई. बेलवाडीच्या देसाईणीची बेअब्रू केल्याच्या आरोपावरून राजाने सखोजी गायकवाड याचे डोळे काढले आणि त्याला जन्मभर अंधारकोठडीत ठेवले हे लक्षात घेतले पाहिजे.

 याबाबतीत राजाने संभाजीराजांचीसुद्धा गय केली नाही याचे उदाहरण फार बोलके आहे. चिटणीसांची बखर हा एकमेव पुरावा असता तर तो ग्राह्य मानता आला नसता. परंतु मुंबईकर इंग्रजांच्या पत्रातही या घटनेस दुजोरा आहे. १६ जानेवारी १६८६ च्या पत्रात इंग्रज लिहितात की, संभाजीने एका ब्राह्मणाच्या मुलीला वाईट मार्गाला लावले होते. रायगडच्या पहारेकऱ्याला शिवाजीराजांनी आज्ञा केली की रोज संध्याकाळनंतर संभाजीने तिच्या भेटीस जाण्याचे सोडले नाही तर त्याचा कडलोट करण्यात यावा. शंभुराजाचे वय त्या वेळी १८ वर्षाचे होते हे विसरता येत नाही. स्वत:च्या पोटच्या मुलाशीसुद्धा राजा किती कठोरपणे वागत होता हे वरील उदाहरणावरुन दिसून येईल. खाफीखान हा राजांबद्दल लिहितो की, शिवाजीच्या सैनिकांसाठी असा नियम होता की लुटीसाठी गेले असता त्यांनी 'मशिदीस, कुराणास किंवा कोणत्याही स्त्रीस त्रास देऊ नये.' त्यावेळच्या युद्धनीतीमध्ये स्त्री-पुरुष लहान मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकण्याची त्यावेळी सर्वमान्य झालेली प्रथा राजांनी प्रथम धुडकावून लावली.युद्धांतील स्त्री-कैदी उपभोग्य वस्तू म्हणून त्यांनी कधीही सैनिकाला वाटू दिले नाही. युद्धात स्त्री-कैद्यांना उपभोगून आपले सवंग सूडाचे समाधान मानून घेण्याची वृत्ती त्यावेळच्या इतर मोगल सरदारामध्ये दिसून येते. पण राजांनी याबाबतीत अतिशय प्रखर कटाक्ष ठेवला आणि 'परस्त्री ना नीती दृष्टी' असाच लौकीक कायम राखला. पराभवापेक्षा विजयाचा आनंद पचवणे हे अवघड. या आनंदाच्या क्षणीच पाऊल घसरण्याची शक्यता असते पण आपल्या संयमशील वागणुकिने शिवाजीराजे एका आदर्श महापुरुषाच्या रांगेत अगदी उच्चपदी बसले. युद्धकाळातच राजे असे वागत असे नाही तर सर्वसामान्य परिस्थितीतही राजाची वागणूक अशीच होती.

 'रायरीच्या कील्ल्याला (रायगडला) लागूनच शिवाजीने एक वाडा (पाचाडला) बांधला होता. उन्हाळ्यात पाण्याची फार टंचाई भासे त्यामुळे तेथील लोकांना अतिशय त्रास होता. शिवाजीने बांधलेल्या वाड्यात एक दिवस राहण्याचा मला (खफीखानला) प्रसंग आला. शिवाजीने आपल्या वाड्याला लागूनच एक विहीर बांधलेली होती. विहिरीला लागूनच त्याने दगडाची एक बैठक तयार करवली होती. त्यावर टेकून बसण्यासाठी दगडाचा लोड तयार केला होता. तेथे तो (शिवाजी)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ५४