पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुलगा वाहवाह हा मात्र कामी आला. शिवाजीबरोबर सजातीय झगडत असताना, परधर्मीयांनी गाजविलेल्या पराक्रमाची याशिवाय अनेक अगणित नोंद न झालेले, स्वराज्याच्या पायांतील दगड असतील, पण मुद्दा महत्त्वाचा येतो तो हा की, आज राजाच्या नावाचा, धर्माचा, जातीचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा तरी अंतर्मुख होऊन विचार करावा. खरोखरीज आपणास राजाच्या रक्ताचा, जातीचा, धर्माचा वारसा सांगण्याचा काडीइतका तरी अधिकार आहे काय? हा पराक्रम गाजविणाऱ्यांची घेतलेली इतिहासातील ही नोंद पूर्ण असेलच असे नाही. राजाच्या नौदलाचे अधिकारी इब्राहीमखान, दौलतखान होते आणि त्यांच्या भरवशावर आणि विश्वासावरच राजाने आपले आरमान उभे केले होते. राजाला परधर्मीयांनी दिलेली ही साथ स्वराज्याच्या निर्मितीत फार मोलाची ठरली.

 शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन

 राजाचा स्वत:चा धार्मिक दृष्टिकोन हा अतिशय उदार होता. राजाने उभ्या हयातीत कधीही ती फक्त हिंदुचाच राजा आहे अशी भावना ठेवलेली ऐतिहासिक कागदपत्रात कोठेही दिसत नाही. किंबहुना राजा हा खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजा होता. नि:संशय त्याला स्वत:ला हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान होता. स्वाऱ्यांवर मोहिमांवर असतानासुद्धा तो आपल्याबरोबर एक स्फटिकाचे शिवलिंग बाळगी. शिवलिंगाची पूजा तो नेमाने करी. त्याचे कुलदैवत शंभू महादेव होते. राजा स्वत: हे राज्य आम्हास शिवशंभूने दिले आहे असे मानत असल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. शिवशंभू हे त्यांचे कुलदैवत. सामर्थ्य आणि शक्तद्दचे दैवत म्हणून तो तुळजाभवानीचाही उपासक होता. परंतु आपल्या धर्मभावनेचा जाच परधर्मीयांना होऊ देत नसे. पुण्याची नवी उभारणी करीत असताना पुण्यातील कसबा गणपतीच्या स्थापनेबरोबरच पुण्याच्या तांबड्या जोगेश्वरीची स्थापना झाली. त्याप्रमाणे पुण्यातील दर्यांची व मशिदींची व्यवस्था पूर्ववत चालू करण्यात आली. काझी मुजावर किंवा परधर्मीय सेवेकऱ्यांना लहानमोठे उत्पन्नाचे साधन करून देण्यात आले. मता नायकीण या मुसलमान कलावंतीणीस शहाजीराजांनी अर्धाचावर जमीन इमान दिली होती. नंतर मातोश्री जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव जहागिरीदारीचा कारभार पहायला लागल्यांनतरही हे इमान तसेच चालू ठेवण्यात आले होते.

 राजाच्या फौजांमध्ये आणि मुलकी अधिकाऱ्यांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक होते. आपल्या प्रजेला ज्या ज्या देवस्थानाबद्दल, प्रार्थनास्थळाबद्दल, साधू संत, तसेच फकिरांबद्दल आदर वाटत होता व प्रेम वाटत होते त्या सर्वाबद्दल राजाने स्वराज्यात आदरच दाखविलेला आहे.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ४८