पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रशासन चालविण्यासाठी पाटील कुलकर्णीसारखे चाकरी वतनदार त्याला थोडी चोच लावणार व गावाबाहेरील वतनदार जहागीरदार, सरदार आणि प्रदेशातील राजांची शासनसत्ता त्यावर हात मारणार अशी महाराष्ट्रातील परिस्थिती होती. सुलतानापर्यंत दोनशे रुपये पोहोचण्याकरता शेतकऱ्याकडून हजारावर रुपये वसूल होत. अंदाधुंदीच्या काळात संरजामशाही अवस्थेत या मधल्या बांडगुळांचे चांगलेच फावले.

 राजे मुरार पंत, शहाजी यासारख्या दरबारातील बड्या प्रस्थांनी बदल घडवून आणायचा प्रयत्न केला तो सरदारांच्या पातळीवर. सरदारांच्या आघाड्या बांधून राजसत्तेत म्हणजे सुलतानाच्या सत्तेत बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 शिवाजीराजांनी वापरलेली वेगळी रणनीती

 गावागाड्यातील सर्व थराची माणसे एकत्र करणे हा त्याच्या रणनीतीचा पाया होता. गावगाड्यातील पुंड आणि नाठाळ पाटील मंडळींवर त्याने कठोरपणे जरब बसवली. याची अनेक उदाहरणे वर दिलेली आहेतच.

 'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा; पत्रे लिहावी; त्यास आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन आम्हांस अनुकूल असावे असे बोलावे.' या धोरणाने गावोगावची निवडक मंडळी त्याने आपलीशी करून घेतली.

 याखेरीज 'मावळे, देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारिले.' बारा मावळांतून अनेक सवंगडी शिवाजीराजास लाभले. नारायण, चिमणाची, बाळाजी मुदगल देशपांडे, तानाजी व सूर्याजी मालुसरे, भिकोजी चोर, सूर्यराव काकडे, बाजी जेधे, त्र्यंबक सोनदेव, दादाजी नरसप्रभू गुप्ते ही त्यांची मित्र मंडळी खरी, पण राजावर त्यांची निष्ठा इतकि की त्याच्या शब्दाखातर प्राण टाकण्यास त्यांनी हयगय केली नसती. पण ही सगळी मंडळी गावगाड्यातली. गावगाड्याबाहेरील कोणीही मंडळी स्वराज्याच्या कामात सहभागी होण्यास राजीखुशीने तयार नव्हती. कान्होजी नाईक जेधे आणि त्यांचे पाहुणे मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर हे दोघेच काय ते अपवाद. कृष्णाजी बांदलाची पुंडाई मोडून काढल्यानंतर बारा मावळांतील देशमुख मंडळी हळूहळू दादोजी कोंडदेव व शिवाजी राजाकडे रुजू होऊ लागली. कानंद खोऱ्यातील मरळ खेडेबाऱ्याचे कोंडे, मुठे खोऱ्यातील पायगुडे, कर्यात मावळचे शितोळे, रोहिडे खोऱ्यातील जेधे, खोपडे तसेच गुंजण मावळचे शिळमकर ही सारी देशमुख मंडळी स्वराज्याला जोडली गेली. पण मावळाबाहेरच्या देशमुख सरदारांपैकी सर्वांशी शिवाजीस संघर्षच करावा लागला.

 ऐतिहासिक दाखल्यांवरून असे दिसून येते की, शिवाजी व त्याचे सहकारी हे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ४०