पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आसवलीची पाटीलकी दत्ताजी व त्याचा पुतण्या दमाजी यांच्याकडे निम्म्या हिश्शाने होती. दत्ताजीने पुतण्याचा खून करून त्याच्या हिस्सा बळकाविला. दहशतीमुळे न्याय मागण्यास कोणीच पुढे येईना. दमाजीचा धाकटा मुलगा सूर्याजी बंगलोरला शहाजीराजांकडे गेला. राजांनी दादोजी कोंडदेवास चौकशी करून निवाडा करण्यास सांगितले. दादोजींनी गुन्हेगारांना कैद करून सूर्याजीच्या बाजूस पुन: पाटीलकि मिळवून दिली.

 कृष्णाजी नाईक बांदल भोरचे देशमुख जबरदस्तीने परस्पर स्वत:कर वसूल करू लागले. त्याच्या या गुंडगिरीविरुद्ध तक्रारी सुरू झाल्या. प्रथम पंतांनी समज दिली व तसे न करण्याबद्दल सांगितले; परंतु तो इतका आडदांड होता की त्याने पंतांच्याच घोड्याची शेपटी साफ छाटून टाकली. पंतानी बांदल देशमुखास कोंढाणा किल्ल्यावर आणून त्यास पुन्हा समजावून सांगितले. तरी तो ऐकेना. पंतांनी त्यांचे हातपाय कलम केले.

 बारा मावळातील पाटील, देशमुख, कुलकर्णी इत्यादी छोट्या वतनदारी रयतेची परस्पर नाडणूक करण्याचे प्रकार पंतांनी अजिबात बंद केले. पूर्वी मलिकंबरचा धारा काहीही असो, रयतेने प्रत्यक्ष दिलेला वसूल हा जास्तच असायचा.पंतांच्या व्यवस्थेमध्ये रयतेची लूट बंद झाली. न्यायाची खात्री निर्माण झाली.

 बाबजी भिकाजी गुजर, खेड शिवापूर जवळच्या रांझे गावचा पाटील. बाबजी पाटलाने पाटीलकिच्या मस्तीत गावातील एका स्त्रीवर बदअंमल केला. चौकशीसाठी महाराजांनी पाटलाला बोलावणे धाडलं. "जहागीर शहाजीराजांची आहे, शिवाजीला हुकूम देण्याचा अधिकार काय?" अशा घमेंडीत पाटलाने नकार दिला. पाटलाला मुसक्या बांधून जेरबंद करून आणण्यात आले. महाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली. गुन्हा शाबीत झाला. हुकूम केला. पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले. (२८ जानेवारी १६४५) पाटलाची पिढीजात पाटीलकि जप्त करण्यात आली. हीच पाटीलकि २० होन अनामत घेऊन बाबाजी पाटलांना म्हणजे बाबजीच्याच दुसऱ्या नातेवाईकाला दिली. हातपाय अपंग केलेल्या पाटलाचा सांभाळ करण्याची अट घालून राजांनी आपण स्थापन करीत असलेल्या स्वराज्यामधील न्यायदानाचा अशा अनेक उदाहरणांनी आदर्श घालून दिला.

 जहागिरीतील सर्व बारा मावळांवर दहशत बसली. शहाजी महाराजांच्या सारख्या जहागीरदारांचा हामुलगा तत्कालीन इतर जहागिरीरदारांच्या मुलांपेक्षा वेगळा निघाला. याने मित्र सवंगडी जमवून गरीब मावळ्यांची, शेतकऱ्यांची पोरं गोळा करायला सुरूवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालूसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरुजी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ३७