पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 शेतकऱ्यांच्या राज्याचे बीजारोपण


 शिवाजीराजाचा जन्म अंदाधुंदी, बेबंदशाही, दुष्काळ आणि गुलामगिरीच्या काळात झाला. त्यांच्या कामगिरीची थोरवी खऱ्या अर्थाने समजण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राजाने जे केले ते त्या काळाच्या परिस्थितीत इतके अलौकीक होते की, त्याच्या मनातील आदर्श व प्रेरणा कशा तयार झाल्या असतील याविषयी कुतूहल आणि आश्चर्य वाटावे. महान क्रांतिकारकांच्या प्रेरणा त्यांना जशाच्या तशा तयार आसपासच्या व्यक्तींकडून क्वचितच मिळतात. इतिहासात परंपरेने आई जिजाबाई व कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे व प्रभावामुळे शिवाजीवर मोठा परिणाम घडला असे सांगितले जाते. परंतु राजांची सबंध कारर्किद पाहता त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणा एकदोघा व्यक्तीमुळे घडले असेल हे असंभवनीय आहे. थोर पुरुषांच्या गुणांची निपज ही पोषक पार्श्वभूमीमुळे होत नाही. उलट आजूबाजूला पसरलेल्या सर्व विरोधी व्यक्तींना आणि अडचणींना तोंड देऊन त्यांच्यावर मात करता करता त्यांनी आपल्या प्रेरणा, आदर्श व शक्तद्द तयार केलेल्या आढळतात. जिजाबाईला शिवनेरी किल्ल्यावर राहायली लागणे मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर येणे आणि शहाजी राजांचे वेगवेळ्या वतनदारांतील आयाराम गयाराम राजकारण आणि त्यातील अपयश या वातावरणाचा शिवाजीराजावर परिणाम होणे अपरिहार्यच होते. पण या गोष्टीपेक्षाही खानदानीच्या बंधनांतून व महालाच्या कैदेतून मुक्त झालेल्या शिवाजीराजाचे आसपासच्या मावळे शेतकऱ्यांशी जडलेले जीवाभाचे संबंध जास्त निर्णायक ठरले असणार.

 पण परंपरेप्रमाणे दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे जमीनधारा, शेतीसुधारणा आणि प्रजासंगोपण याबद्दलच्या राजाच्या कल्पना बनल्या असे मानले जाते. त्यामुळे दादोजींची शेतीव्यवस्था पाहणे महत्त्वाचे ठरते.

 दादोजी कोंडदेव हे दौड तालुक्यांतील पाटस जवळील मलठण गावचे कुलकर्णी. शहाजी महाराजांच्या पदरी पूर्वीपासून असावेत. पुणे आणि सुपे प्रांताची जहागिरी भोसल्यांकडे फार पूर्वीपासून. मालोजीराजांना ही जहागिरी निजामशहांनी दिली.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ३४