जमिनीच्या तुकड्यावरून आणि शेतकऱ्यांच्या लुटीच्या मोबदल्यावरून आपापसात भांडत होते. जेधे-बांदल संघर्ष हा त्या दृष्टीने ठळक आणि महत्त्वाचा आहे. अखेर या दोन सरदारांच्या आपापसातील वैराचा निर्णय लढाईनेच लागला. अगदी ठरवून युद्ध घडवून आणले. रणखांब ठोकले गेले. युद्धाच्या ठरलेल्या तिथीनुसार परस्परांना आव्हान देत बांदलांचे १२५० लोक आणि जेध्यांचे ७०० लोक रणभूमीवर आले. ३०० माणसे लढाईत कापली गेली. मृतांचे देह जातवार वेगळे गेले. घरे मोडून त्याचे वासे काढून प्रेते एकत्र जाळली गेली.
कारीचे जेधे व उतरावळीचे खोपडे यांचे पिढ्यान्पिढ्यांचे वैमनस्य होते. बिदरच्या बादशहाकडून आबाजी जेध्यांना देशमुखीच्या वतनाची सनद मिळाली. ती घेऊन येत असल्याची बातमी खोपड्यांना कळताच गाडे खिंडीत गाठून जेध्यांना त्यांनी ठार मारले. तेव्हा जेध्यांच्या वंशाने हे वैर पुढे कायम ठेवले आणि खोपड्यांचे एक लग्न करनवडे मुक्कामी येत असल्याचे कळताच पाळत ठेवून लग्नाचे सारे वऱ्हाडच जेध्यांनी कापून काढले. या हत्याकांडात बायकाही कापल्या गेल्या. चोरगे - शिळीमकरांचे वैरही असेच प्रसिद्ध आहे. पायगुडे, ढमाले, देशमुख यांच्यामध्ये जीवघेणी हाणामारी सुरू झाली. पाटीलकीसाठी कोंडाजी तानवणेने लुमाजीच्या कुटुंबात ६ खून पाडले, तर लुमाजीच्या कुटुंबाने कोंडाजीचे दोन. कानदखोऱ्यातील बळवंतराव देशमुखांनी आपल्या भाईबंदांच्या गावावर अचानक छापा घालुन कापाकापी केली. घरेदारे पेटवून दिली. आगीत १० बैलगाड्या व १० म्हशी ८ पारडी जळून खाक झाली. रंगोजी कृष्णाजी याने आपला मुलूख देऊन जावई करून घेतले. पाहुणचारासाठी बोलावून जावयाला जहर खाऊ घातले. हेतू हा की, 'वतन दरोबस्त लेकीचे होईल व मग ते आपल्या हाती येईल.' अशामुळे आपली लेक विधवा होईल याची यत्किंचितही काळजी त्यांना नव्हती
या संघर्षामागे वतन मिळविणे हेच उद्दिष्ट असेल असे नाही. जाधव-भोसल्यांच्या संघर्षांमध्ये शहाजीराजांचे सरदार खंडागळे यांचा हत्ती बेफाम झाला. रस्त्यात दिसेल त्याला सोंडेने उचलून टाकू लागला. शिवाजीराजांचे सख्खे मामा दत्ताजी जाधवराव या उन्मत्त हत्तीला आवरण्यासाठी पुढे आले. तर विरुद्ध बाजूने संभाजी राजे व खलोजी भोसले हे हत्तीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावून उभे राहिले. तुंबळ युद्ध झाले. या संघर्षाला हत्ती हे फक्त कारण मात्र झाले. दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराव भोसले निजामशहाच्या महालापुढे ठार झाले. सारांश एवढाच, हिंदू हिंदूतील वतनदार खानदानी घराण्यांतील भांडणांमध्ये नात्यागोत्याचासुद्धा विसर पडत असे.
महाराष्ट्रातील क्षात्रतेज, ब्राह्मतेज असे लोप पावत चाललेले होते. सर्वच क्षेत्रात