पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते सुलतानाकडे धाव घेत. नाशिक येथील 'वेदोनारायण' ऋग्वेदी यांत्रेकरूंची पिंडे कुणी पाडायची आणि यजुर्वेदी यात्रेकरूंची पिंडे कोणी पाडायची याकरिता भांडत होते.आणि आपापसात भांडून निर्णय मागायला बादशहाकडे किंवा वजिराकडे जात होते.

 सप्तशृंग भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदारापुढे जात होता. याचवेळी कित्येक वेदशास्त्रसंपन्न शास्त्री, पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी गोदावरीच्या तीरावर किंवा कृष्णेच्या तीरावर पूजाअर्चा करून. "हजरत साहेबांना परमेश्वराकडून दुवा' मिळवून देत होते. पंढरपूरचे बडवे व महाजन देवापुढच्या विड्यासाठी भांडत होते. कोकणात देवरुखे व इतर ब्राह्मण देवरुख्यांच्या घरी ब्राह्मणांनी जेवायचे की नाही यासाठी वितंडवाद घालीत. सबंध महाराष्ट्र जुलूम, अत्याचार आणि गुलामगिरीच्या टाचेखाली भरडला जात आसताना वैदिक धर्माचा वारसा सांगणारे भिकेसाठी, वतनाच्या एका तुकड्यासाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी आपापसात भांडत होते. विद्वान वेदशास्त्रसंपन्न समाजधुरीणांची ही अवस्था होती. दुसरीकडे, क्षात्रतेजाचा वारसा सांगणाऱ्या मराठे सरदारांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ते लढत होते, शौर्य गाजवत होते. मोगल, निझाम किंवा आदिलशहाच्या तख्ताच्या रक्षणासाठी आणि रयतेला लुटून बादशाही खजिना भरण्यासाठी. छत्रपती शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी राजे यांचा सुपे आणि पुणे परगणा हा प्रांतसुद्धा मराठ्यांच्या या लुटीतून सुटू शकला नाही. शहाजीराजांनी आदिलशहाचा मुलूख मारला तो निझामासाठी. पण आदिलशहाचा वजीर खवासखान याने शहाजीराजांची बंडखोरी मोडण्यासाठी रायाराव व मुरारपंत या दोन मराठी सरदारांना पाठविले. आदिलशहाच्या फौजा पुण्यात घुसल्या. सैनिकांनी पुण्यात थैमान घातले. शहाजीराजांचे वाडे पेटविले. गरिबांच्या हालाला तर पारावारच उरला नाही. तलवारीचे वार आणि आगीच्या ज्वाळांचा तडाखा चुकविण्यासाठी ते पुणे सोडून पळत सुटले. रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पार पाडून टाकली, पुण्याच्या डौलदार वेशी सुरूंगाने उद्ध्वस्त केल्या. महंमद आदिलशहा आणि खवासखानाच्या मनातील शहाजीराजांची जहागिरी उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पूर्ण केले ते मराठे सरदार मुरारपंत आणि रायारावाने. या शौर्यासाठी रायारावाला आदिलशहाने 'प्रतापराव' असा किताब बहाल केला. रायाराव व मुरारपंतानी खरोखरीच चार पायाची गाढवे आणून त्यांचा नांगर पुण्यावरून फिरवला. लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकली. फुटकी कवडी आणि तुटकी वहाण पुण्यात टांगून ठेवली. हेतू हा की स्वाभिमानाने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा होतो अशी दहशत बसावी.

 अशा या असुरक्षित राजकिय अस्थिरतेच्या वातावरणात मराठे सरदार मात्र

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ३०