पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेपढा महसूलसुद्धा गोळा होत नसे....भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वत:ला विकून घ्यावयास तयार होते. पण विकत घेणाराच कोणी नव्हता. एका भाकरीसाठी लोक आपल्या पदाचा त्याग करावयास तयार होते. पण त्याची कोणाला पर्वा नव्हती. शेवटी दारिद्र्य इतके शिगेला पोहोचले की, माणसे माणसाला खाऊ लागली आणि पुत्रप्रेमापेक्षा त्याचे मांस हे त्याला प्रिय वाटू लागले.'

 याचवेळी उत्तरेतही पाऊस पडला नाही. पण दिल्ली दरबाराच्या कार्यवाहीमुळे दक्षिणेतेल्याइतके दुष्काळाचे भीषण परिणाम जाणले नाहीत. महाराष्ट्रात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. महाराष्ट्रात नेमका अंमल कोणाचाच नव्हता. एक राजा नव्हता. बेबंदशाही माजली होती आणि सगळीकडे लुटारूंचे साम्राज्य पसरले होते.

 राजवाडे या दुष्काळासंबंधी 'राधा-माधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत म्हणतात, "एका हंदक्यास म्हणजे लहान होनास २०० दाणे झाले. अखेर करवसुली शक्य नसल्यामुळे मूर्तजाची (निझाम) आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली.'

 परमानंदाच्या शिवभारतातसुद्धा या दुष्काळाचा उल्लेख आहे. अर्थात त्यात कवीला शोभेल अशी अतिशयोक्तद्द असणे शक्य आहे.

 "पुष्कळ काळापर्यंत अहमद निझामानंतरच्या देशात धान्य महाग आणि सोने स्वस्त झाले. श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीथ घेत. खाण्यास काही नसल्यामुळे एकच हाहाकार उडून पशू पशूस आणि माणसे माणसास खाऊ लागली.' (शिवपूर्व शिवभारत अध्याय ८; ५३- ५५)

 या दुष्काळाबद्दल इंग्शिल फॅक्टरी रेकॉर्डस्मध्ये एका समकालीन व्यापाऱ्याने असे म्हटले आहे, 'लोकांची एकच मागणी होती- आम्हास खावयास द्या, नाही तर मारुन टाका.'

 या दुष्काळात वतनदाराची वागणूक शेतकऱ्यांशी कशी होती कशी होती याचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक होतील. शेतकऱ्याकडील महसूल हे वतनदारांचे मौजमजा उडवायचे साधन असल्यामुळे या दुष्काळी परिस्थितीतसुद्धा वतनदाराचे महसूल अधिकारी वसुली करण्यासाठी थैमान घालीत. वसुलीसाठी गावे बेचिराख केली जात.

 सैनिक उभ्या पिकाचा फडशा पाडत. या दुष्काळी परिस्थितीत तर शेतकऱ्याकडे रोख काही नसल्यामुळे अधिकाऱ्यांची वक्र दृष्टी त्यांच्या घराकडे वळे आणि असेल नसेल ते किडूकमिडूकही लुटले जाई.

 या दुष्काळाचा फटका तुकाराम महाराजांसारख्यांना बसला. तुकाराम महाराजांची पहिली बायको व त्यांचा एक मुलगा या दुष्काळात अन्न अन्न करीत मरण पावला.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / २८