पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाराष्ट्रावर विजापूरचा आदिलशहा, नगरचा निजामशहा आणि दिल्लीतील मोगलशाहीच्या सुभेदारांचा अंमल होता. सर्व शाह्यांच्या ताब्यातील मुलूखांच्या सीमा लागून असल्यामुळे एकमेकांचा मुलूख बळकावण्याच्या सरदाराच्या सत्ता स्पर्धा नेहमीच चालत. महाराष्ट्रातील जनतेला त्या काळात जाच होत होता. आपपल्या मुलूख वाढवणे राज्याच्या सीमा विस्तारित करणे, गेलेले मुलूख परत मिळविणे, जिंकून नवा मुलूख ताब्यात घेणे याचा परिणाम त्यावेळच्या रयतेवरच होत असे. खेडूत, शेतकरी, बलुतेदार कोणाच्या तरी फौजेकडून लुटूनच घ्यायचे आहे अशा अपेक्षेत जगत.

 देशमुखी व वतनदारी ही त्या काळात रूढ झालेली होती. वतनदारांनी फौजा ठेवायाच्या, त्या फौजांनी शेतकऱ्यांची लूट करायची आणि लुटीचा एक भाग हा ज्या सरदाराची वतनदारी त्या भागात असेल त्याला द्यायचा. शिवाजीराजाच्या जन्मापूर्वी फक्त २ वर्षे आधी म्हणजे १६२८ ते १६३० या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. सतत दोन वर्षे पावसाचा थेंबही नाही. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादनही नाही. बादशहाच्या फौजांकडून वेळोवेळी झालेल्या लुटीमुळे शेतकऱ्यांकडे धान्याचा साठा म्हणून शिल्लक राहिला नव्हताच. साहजिकच महाराष्ट्रामध्ये अन्नानदशा निर्माण झाली. याचे समर्थ रामदासांनी अतिशय बोलके असे वर्णन केलेले आहे.

 पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला
 जन बुडाले बुडाले, पोटेविण गेले
 बहु कष्टले, किती येक मेले
 माणसा खावया अन्न नाही। अंथरुण पांघरुण तेहि नाही
 कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जाली।
 कितेक ते आक्रंदली । मुलेबाळे ॥
 कितेक जिवे घेतली। कितेक जळी बुडाली।
 जाळिली ना पुरली। किती येक ॥
 भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना । काय म्हणावे।
 लोके स्थानभ्रष्ट जाली। कितेक तेथेचि मेली।
 उरली ते मराया आली। गावावरी ॥
 प्राणिमात्र जाले दु:खी।


 याच परिस्थितीचे वर्णन 'बादशहानाम्या'त अत्यंत भेदक केलेले आहे.या दुष्काळाचा परिणाम मराठी मुलखास दीर्घकाळ भोगावा लागला.

 '१६३० ते १६५३ या काळात दक्षिणेतून बादशहाच्या खजिन्यात एक पैसाही जमा झालेला नाही, एवढेच नव्हे तर स्थानिक प्रशासनाचा खर्च करण्यासाठी आवश्यक

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / २७