पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निघालेल्या दिंडीतील वारकरी चिंचवडभोसरीपर्यंतच उदार भाविकांनी वाटलेले कुरमुरे, केळी आणि दशम्या किती हव्यासाने गोळा करतात हे पाहिले म्हणजे पंढरपूरची वारी हा निराधारांचा आधार आहे हे स्पष्ट होते. वारकरी पंथाने या चलनवलनातील लाचारीचे रूप काढून टाकले. पंढरपूरला जाणारे पोटार्थी भिकारी राहिले नाहीत. पंढरीनाथाचे पुण्यवान भक्त झाले. त्यांना भाकरतुकडा घालणारे श्रीमंत दाते राहिले नाहीत. विठोबाच्या भक्तांच्या सेवेचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील भक्तिमार्ग हा एका अत्यंत बिकट दैनावस्थेत समाजाला तगवून धरणारा चमत्कार ठरला तो असा.

 १६ व्या शतकाच्या शेवटी आणि १७ व्या शतकाच्या सुरूवातीस मुसलमान अंमलाखालीच का होईना मराठी सरदारांचा पुन्हा उदय होऊ लागला आणि नवीन बदलाची पहाट दिसू लागली त्यावेळी निवृत्तीपर संतपंथाबरोबरच रामदासांच्या आचार्य परंपरेलाही जोम आला. पुन्हा रामदासांच्या ओजस्वी वाणीत आपले प्रतिबिंब पाहू लागला होता.

 मराठ्यांचा अभ्युदय

 १६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेतील सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय अन् मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातही अंदाधुंदी आणि बेबंदशाही माजलेली होती. दरबारातील वजिरापासून मनसबदारापर्यंत सगळेजण सतत कटकारस्थानात गुंतलेले असत. कधी सुलतानाची मर्जी सांभळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदाराबरोरब महाराष्ट्रात घोरपडे, घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी, आपले सैन्य बाळगावे, सरकार दरबारात सारा भरावा, दरबाराच्या अधिकाऱ्यांशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्याच्या वतनातूनही लूटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती. त्यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी शाही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन एकदा अत्यंत दुःसह झाले. शिवाजीच्या जन्माच्या वेळी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / २६