पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनसामान्यांच्या मराठी भाषेत मांडणे. संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण समाजापुरती मर्यादित. सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेतलेच. धार्मिक विधीच्या वेळी ब्राह्मणांच्या तोंडून न समजणाऱ्या मंत्रांचे घोष ऐकण्यापलीकडे लोकांची धर्मविचाराशी वा तत्त्वाशी तोंडओळख होण्याची काहीही शक्यता नव्हती. सर्व धर्मकारण मराठीत आणून अत्यंत दुष्कर परिस्थितीत कथाकिर्तनांचा जोर लावून आणि स्वत:च्या शुद्ध, सात्त्विक आचरणाच्या प्रतिष्ठेची जोड देऊन संतांनी सामान्यजनांना धर्मविचाराचे एक नवीन दालन उघडून दिले. धर्म म्हणजे निरर्थक वटवट नाही. धर्मविचार सामान्य जीवनातही महत्त्वाचा आहे. सामान्यांनाही कळण्यासारखा आहे याची जाणीव जनसामान्यांना पहिल्यांदा झाली आणि या नव्या दालनातील विचारांच्या वैभवाने ते दिपून आणि मोहरून गेले. तुकडे तुकडे झालेल्या समाजाला एकत्र जोडण्याकरिता संतांनी केलेले हे काम अद्वितीयच मानावे लागेल.

 वारकरी पंथाची शिकवण व त्या पंथाने तयार केलेल्या संस्था समकालीन समाजाच्या परिस्थितीशी निगडित होत्या. पंथाला समाजात जी मान्यता मिळाली त्याचे कारण समाजाची अत्यंत आवश्यक गरज वारकरी पंथ भागवीत होता. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे वारकरी पंथाचा गाभा समजली जाणारी पंढरपूरची आषाढी यात्रा. भर खरिपाच्या हंगामात बहुसंख्य कोरडवाहू शेतकरी लाखालाखाच्या संख्येने शेतीतील कामे-धामे संपवून पंढरपूरला जातात ही तर्काला न पटणारी गोष्ट. पंढरीच्या वारीतील भक्तिभावपाहून अनेकांनी भक्ति रसाने ओथंबलेली काव्ये रचली. विठोबाच्या भक्तद्दची पेठ उघडली गेली आणि विठोबा रखुमाई हा मोठा किफायतशीर व्यवसाय बनला. पंढरपूरला जाणारा वारकरी शेतीतील कामे सोडून भक्तद्दच्या पुरात वाहात पंढरपूरला जातो ही गोष्टच मुळात खोटी. देहू, आळंदी तसेच पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या जेथून जेथून निघतात ते सगळे विभाग कोरडवाहू शेतीचे आहेत. त्या भागात भूगर्भातील पाणी जवळ जवळ नसल्यासारखे. अस्मानी आणि सुलतानीने शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की शेवटचे धान्य खाऊन शिमगा साजरा करायचा. मुळे,पाने, गवताचे बी असे खाऊन आणखी काही पंधरवडे डबरा भरायचा. आगोठीला बियाण्यांची ज्वारी जी शिल्लक असेल ती नाहीतर उसने पासने करून आणलेली शेतात फेकायची; आणि हाती काही तरी पीक येईपर्यंत देशोधडीला लागायचे. पंढरपूरच्या आसमंतातील जमिनीच्या पोटात उदंड पाणी आहे. आजही तेथील एकेका विहिरीवर सात आठ एकर ऊस निघू शकतो. ज्वारीचे पीकही भरभरून येते. कोरडवाहू शेतकरी पोटाच्या सोयीकरिता निघाले की त्यांचे पाय साहजिकच पंढरपूरकडे वळत. साहजिकच वाटेने भले शेतकरी त्यांना भातरतुकडा घालायला मागेपुढे पाहत नसत. आजही देहू आळंदीहून

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / २५