आला. ३०० वर्षांनंतर पुन्हा फुलून उठलेल्या या अस्मितेचे रहस्य काय?
ज्यांच्या आयुष्याच्या एक क्षणाची शाश्वती नाही, ज्यांना संध्याकाळच्या भाकरीची भ्रांत आहे आणि पोराबायकांच्या अब्रूचीही खात्री नाही असा समाज कोणते तत्त्वज्ञान स्वीकारेल? हजारो गाईचे कळप बाळगणाऱ्या सुरक्षित, संपन्न आर्य समाजाच्या यज्ञयागांना त्याच्या दृष्टीने काहीच अर्थ नसणार. स्वस्थ गृहस्थीची यज्ञयाग आणि पुरुषार्थाचा गौरव करणारी नीतितत्त्वे पराभूत अपमानित समाजाच्या काय उपयोगाची?
एका बाजूला देवगिरीवर हल्ला होत असताना संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची गुढी रोवली. परमेश्वराशी एकरूप होण्याचा नामसाधन हा मार्ग भक्तिपंथाने मांडला.अगदी निराधार निराश्रितांनासुद्धा परमेश्वराचे नाव मुखी घेण्याची तरी शक्यता आणि स्वास्थ्य असते.हरघडी डोळ्यासमोर ओढवणाऱ्या दु:खातून मोकळे कसे व्हावे? तर या इहलोकीच्या दुःखाना काही महत्त्वच नाही. 'बाईल मेली बरे झाले, पोर मेले त्याहून बरे झाले.' अशाही परिस्थितीत तुकारामाला आयुष्य सार्थकी लावता येते तर आपल्याला निराश होण्याचे काय कारण? 'जयजय रामकृष्ण हरी' आणि 'पुंडलिक वरदा'च्या घोषाने दुःखे संपली नाहीत तरी या दुःखापलीकडे पाहण्याची ताकद समाजाला मिळाली.
भक्तिमार्गाने समाजात एक मोठा बदल घडवून आणला. चातुर्वर्ण्याने समाजाची शकले पडली होती. जातीच्या बंधनांपलीकडे जाणे वरच्या वर्णातील लोकांनाही शक्य नव्हते. खालील जातीत जन्मलेल्यांना त्यांच्या अवस्थेविषयी तक्रार करण्याचीही शक्यता नव्हती. धर्म आणि अध्यात्म ही केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी. जन्मभर काबाडकष्ट, निकृष्ट राहणीमान आणि दैनंदिन जीवनात पदोपदी अपमान आणि अवहेलना या पलीकडे शूद्रातिशूद्रांना दुसरे आयुष्य नव्हते.निव्वळ माणुसकि म्हणून त्यांच्याकडे पाहणेसुद्धा धर्मसंमत नव्हते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराजापर्यंत सर्व संतांनी जातीव्यवस्थेतील उच्चनीचतेवर आपल्या लिखाणाने आणि वागणुकिने उघडपणे आघात केले. शूद्रातिशूद्रांना समाज पारखा झाला होता. मुसलमानी आक्रमणाचे त्यांना दु:ख वाटणे तर सोडूनच द्या पण सोयरसुतक वाटत नव्हते. संतांनी उपदेशिलेल्या भक्तिमार्गामुळे त्यांच्या मनात आसपासच्या समाजाशी आपले काहीतरी लागेबांधे आहेत अशी भावना तयार होणे शक्य झाले. पण भक्तिमार्गामुळे जातीव्यवस्था संपली नाही. ती आजतागायतही संपलेली नाही; पण निदान परकिय आक्रमणाला तोंड देण्यापुरते का होईना वेगवेगळ्या जातीचे लोक एक फळी उभारायला तयार होऊ लागले.
संतांनी बजावलेली आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे अध्यात्म व धर्म