पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येचा सबंध त्यांच्या धर्माशी नाही तर त्यांच्या गरिबीशी असलेला संबंध आहे.

 कुणी सांगायला लागले, 'अरे ते चार बायका करतात म्हणून लोकसंख्या वाढते.' चुकीची गोष्ट आहे. शास्त्रीय सिद्धांत हे सांगतात की, लोकसंख्या वाढीची गती प्रजननक्षम म्हणजे मुलाला जन्म देऊ शकणाऱ्या वयात असणाऱ्या स्त्रियांच्या एकूण संख्येशी संबधित आहे. त्या माणसाने एका बाईशी लग्न केले काय, दहा बायकांशी लग्न केले काय, जन्म देणाऱ्या मातांची संख्या तेवढीच आहे तोपर्यंत त्याचा लोकसंख्येवर काहीही फारक पडत नाही. ही अगदी साधी, शेंबड्या पोराला समजणारी गोष्ट आहे.

 हिंदू मुली मुसलमान मुलांशी जास्त वेळा लग्न करतात. खरी गोष्ट आहे; पण याचा अर्थ समजून घेतला का? शंभर वर्षे इंग्रज हिंदूस्थानात राहिले. शंभर वर्षांमध्ये हिंदू मुलींनी इंग्रजांशी किती वेळा लग्नं केली? आणि त्याच्या उलट इंग्रज मुलींनी हिंदू मुलांशी किती वेळा लग्न केली? याचे तुम्ही प्रमाण काढले तर दहास एकसुद्धा निघणार नाही. कारण समाजशास्त्रीय सिद्धांत असे सांगतो, की 'अप्रगत समाजातील मुलांशी प्रगत समाजातील मुलींची लग्न जास्त वेळा होतात.' एक अप्रगत समाज, दुसरा प्रगत समाज. इंग्रज समाज आपल्यापेक्षा प्रगत होता म्हणून त्या समाजातील मुली अप्रगत हिंदू, मुसलमान समाजातल्या मुलांशी लग्न करत होत्या. उलट्या दिशेने लग्न होत नव्हती.

 पण हे सर्व सिद्ध, शास्त्रीय अर्थ समोर असताना शहरी शहाणी, भली भली माणसं एकदा माथी फिरली म्हणजे त्यांचा युक्तिवाद करतात. एवढेच नव्हे तर दुसऱ्याचे खून पाडायला लागतात.

 मला ९० सालची चिंता वाटते ती ही, की कुठे राजमन्मभूमीचा प्रश्न असो का आणखी कोणत्या बाबरी मशिदीचा प्रश्न असो की कोण्या सलमान रश्दीचा प्रश्न असो, दोन्ही बाजूंची माणसं आपापले कळप राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्हाला काय वाटते या माणसांनी तुम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे गावात जाऊन प्रचार करता, काम करता, कष्ट करता, पैसे खर्च करता तसा त्यांच्यपैकी कुणी प्रचार केला आहे; यांना एक चांगली कळ सापडली. धार्मिक भावनांना आवाहन केले, की धर्माची माणसं सगळीच्या सगळी आपल्यामागे माना खाली घालून चालतात, हे रहस्य त्यांना समजलं आहे आणि स्वस्तात स्वस्त, फुकटात फुकट, फायद्यात फायद्याचा, सगळ्यांत जास्त सोयीचा धंदा कोणता असेल तर धार्मिकतेचा. जातीयतेचे राजकारण करणे हे सर्व बाजूंच्या गिधाडांना एक हत्यार

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / २०६