करू शकतात फक्त तुमच्यामधील जातीच्या, धर्माच्या आधारावर तुमच्यात फूट पाडणारे.
काही काही वेळा यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मला मोठे आश्चर्य वाटते. मी अपघाताने हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आहे. आपण आपल्या धर्मावरती टीका करणे, जहाल टीका करणे हे जास्त सौजन्याचे लक्षण आहे म्हणून मी करतो; पण माझ्या विश्लेषणामध्ये, लेखी विश्लेषणामध्येसुद्धा इस्लाम धर्माची स्थापना आणि प्रसार, किंबहुना सर्वच मूर्तिभंजक चळवळींचा प्रसार हा मुळी, देवळादेवळांमध्ये साठलेली संपत्ती लुटण्याकरिता झाला आहे, असे मी स्पष्टपणे म्हटले आहे. तेव्हा कुण्या एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्मावर टीका करण्याचा प्रश्न तर माझ्या बाबतीत येतच नाही; पण मी काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो.
मुसलमानांविरुद्ध प्रचार करताना या हिंदूत्ववाद्यांमध्ये काही ठराविक युक्तिवाद वापरले जातात. युक्तिवाद क्रमांक एक-मुसलमानांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे आणि आपण हिंदू काही करणार आहोत की नाही? युक्तिवाद क्रमांक दोन- मुसलमानांना चार चार लग्नं करण्याची परवानगी आहे. त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढते आहे. आम्ही हिंदू काही करणार आहोत की नाही? तिसरा युक्तिवाद - हिंदू मुली मुसलमान मुलांशी फार मोठ्या प्रमाणात लग्न करताना दिसतात. त्या मानाने मुसलमान मुली हिंदू मुलांशी लग्न करीत नाहीत.
पहिला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे तो हा, की मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीचा संबंध त्यांच्या धर्माशी नाही. त्यांच्या गरिबीशी आहे. हे विश्लेषण दलित, शीख किंवा दुसऱ्या कुठल्याही समुदायाबद्दल मी करू शकेन; पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांत निकड आज ज्या प्रश्नाची पडली आहे त्या प्रश्नाबद्दल मी बोलतो आहे. जर का सर्व मुस्लिम समाजाचे एक चित्र काढायचे ठरले, आर्थिक, तर ते चित्र असे आहे. गावातला मुलाणी म्हणजे बकरी कापाण्याकरिता नेऊन ठेवलेला मनुष्य, विणकर तालुक्याच्या गावचा रिक्षावाला किंवा मुंबई शहरातला व्यापारी आणि स्मगलर. हे मुसलमान समाजाचे चित्र आहे. हा आलेख आहे. हे सगळे शहरातले वेगवेगळे व्यवसाय करणारे; पण सर्व समाजाचे चित्र जर पाहिलं तर अत्यंत दरिद्री, ज्याचे वर्णन मी दलितांतील दलित असे केले. आज दुर्दैवाने अशा मुसलमान समाजाच्या आर्थिक परिस्थितीच्या पाहणीचा एकसुद्धा अहवाल नाही.
जगामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात जो काही सिद्धांत आहे, तो असंच सांगतो की, लोकसंख्या वाढण्याची गती ही जितका समाज गरीब तितकी जास्त असते.