पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मजूर आणि जमीनदार हिंदू अशीच होती.

 आपल्या देशात सगळीकडे हे असेच आहे, कारण जे आक्रमक मुसलमान आले ते मूठभर, पण येथील असंख्य गरिबानी धर्मांतर केले. आपल्या देशातील मुसलमान हे दलितांतील दलित आहेत.

 सिंध आणि बंगालची आपण परिस्थिती पाहिली. प्रश्न आर्थिक होता; पण त्याला रूप धार्मिक देण्यात आले आणि या देशाचे तुकडे झाले.

 पंजाबमध्ये सर छोटूराम यांच्या नेतृत्वाखाली शीख, मुसलमान, हिंदू शेतकऱ्यांना एकत्र करणारी युनियन तयार झाली आणि तिची ताकद इतकी होती, की लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसलासुद्धा त्यांची मदत घेऊनच पंजाबमध्ये आपलं शासन तयार करावं लागलं. जोपर्यंत सर छोटूराम जिवंत होते तोपर्यंत सध्या जो पंजाब पाकिस्तानात आहे त्या पंजाबमध्येसुद्धा मुस्लिम लीगला एक कार्यालयसुद्धा उघडता आले नव्हते. एवढी त्या शेतकरी आंदोलनाची ताकद होती. सर छोटूराम गेले. राजकारणी आले आणि पंजाब हा मुस्लिम लीगचा महत्त्वाचा अड्डा बनला.

 सकाळी भूपेंद्रसिंग मान यांनी सांगितले, की "पंजाबमधला ९९ टक्के शीख शेतकरी आहे. हरितक्रांती झाली त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. व्यापाऱ्यांना मिळाला आणि व्यापारी लाला आहेत. याचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही." भारतीय किसान युनियन आंदोलन तयार करते आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांच्या उठावाला यशस्वी करण्यापेक्षा अकाल्यांच्या आणि अतिरेक्यांच्या आंदोलनाला यशस्वी करता आले तरी चालेल, असे झाले...

 ...तेव्हा आपण शेतकरी संघटनेच्या सर्व लोकांनी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आम्ही अर्थवादी आहोत; पण माणसामध्ये अशी काही पशुता आहे, की त्याला म्हटलं, अरे तुझा प्रश्न कांद्याच्या भावाचा आहे तर तो हो म्हणेल, कदाचित रस्त्यावरती यायलाही तयार होईल. कदाचित एखाद्या दिवशी कंटाळा आला तर म्हणेल, 'जाऊ द्या, माझं काम आहे. मी नाही येत...'

 ...ज्या गोष्टींवर त्याचं आयुष्य अवलंबून आहे त्याच्यावरती तो फिके बोलतो पण त्याला जर का सांगितले, 'अरे, हा तुझ्या सर्व पूर्वजांचा, मुसलमान धर्माचा प्रश्न आहे, हिंदू धर्माचा प्रश्न आहे' तर तो लगेच मरायला तयार होतो. एवढेच नव्हे तर तो आपल्या शेजाऱ्याचा कोथळा काढायला तयार होते. आजपर्यंत अर्थवादी चळवळीचा या जातीयवाद्यांनी, धर्मवाद्यांनी फार वेळा पराभव केला आहे. अर्थवादी पायावरती तुमचा पराभव कोणी करू शकत नाही. तुमचा पराभव

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / २०४