पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नागपूरहून-पुण्याला जात होतो. आमच्या डब्यात भगवे वस्त्र घातलेले एक बाबा आले. फार प्रसिद्ध आहेत ते बाबा. त्यांचे काही रिझर्व्हेशन झालेले नव्हते म्हणा किवा तिथे जागा नव्हती. एक बाई तिथे बसल्या होत्या. त्यांनी काही त्याला बसू दिल नाही. मग ते चेकरकडे गेले. चेकरकडनं जागा मिळविली आणि आल्याबरोबर त्यांनी लगेच स्वगतरूप भाषण सुरू केलं. काय चालू केलं?
 "मुसलमान प्रवासी आला तर मुसलमान त्याला जागा करून देतो, पारशी मनुष्य आला तर पारशी प्रवाशाला पारशी सहप्रवासी जागा करून देतो; पण हिंदू सहप्रवासी आला तर दुसरा हिंदू मात्र त्याला जागा करून देत नाही. यासंबंध हिंदू धर्माचे काय होणार?" बाबाचे थोडेसेच बोलणे झाले; पण काही क्षणातच वातावरण इतके विषारी आणि भयानक झाले, की समोरचा प्रवासी, चांगला शिकलेला, नागपूरचा असावा, वकील. तो पटकन काय बोलायला लागला माहीत आहे? 'खरंच राव, तुम्ही म्हणताय ते खरे आहे. या मुसलमानांचा फारच अनुनय चाललाय. बघा बघा, त्यांना चार बायका करण्याची परवानगी आहे. या सर्व लोकांना, मुसलमानांना चार बायका करण्याची परवानगी याविषयी आकस व मत्सर का वाटतो कुणास ठाऊक? पण त्या डब्यातील वातावरण केवढं विषारी झालं!

 हाच प्रकार प्रत्येक गावामध्ये होऊ शकतो. गरिबीने, बेकारीने नाडलेल्या मुलाला शेतीमालाच्या भावाचे अर्थशास्त्र समजावून सांगण्यापेक्षा दुसऱ्या कोणत्यातरी एखाद्या माणसाविरुद्ध जातीच्या आधाराने, धर्माच्या आधाराने द्वेषच शिकवायला गेले तर माणसांच्या भावना पटकन तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये जर का कुठे दंगलीची ठिणगी पडली, चारदोन माणसांचे कोथळे बाहेर पडले म्हणजे अगदी सज्जन वाटणारी शिकलेली माणसंसद्धा दंगा झाल्यावरती 'किती माणसं मेली?' असे नाही विचारत. विचारतात, 'आपले किती गेले, त्यांचे किती गेले?' माणसामाणसामध्ये असे भेद पाडणारे विचार हे पटकन तयार होऊ शकतात.

 या शतकाच्या सुरुवातीला केरळमध्ये शेतमजुरांचा उठाव झाला. आंदोलन झाले. केरळातील परिस्थिती अशी, की शेतमजूर त्यावेळचे जवळजवळ सगळे मोपला मुसलमान होते आणि जवळजवळ सगळे जमीनदार हे नम्बुद्री ब्राह्मण; पण खरा लढा होता शेतमजूर विरुद्ध जमीनदार असा; पण हे मुसलमान आणि ते ब्राह्मण म्हटल्याबरोबर त्याला हिंदू -मुसलमान दंग्याचे स्वरूप आले. शेतमजुरांचा प्रश्न बाजूला राहिला.

 पूर्व बंगालमध्ये शेतावर काम करणारे मुसलमान आणि तिथले जमीनदार सगळे दासगुप्ता, घोष... सगळे बंगाली ब्राह्मण! सिंधमध्ये हीच परिस्थिती. मुसलमान

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / २०३