पॅलेस्टिनी निर्वासित आणि त्यांचे नेते अराफत यांनी आरंभलेल्या युद्धाला ४० वर्षे झाली. अराफतांनी किती विमानं पळविण्याची व्यवस्था केली, किती ठिकाणी दंगली घडविल्या? एक गोष्ट केली नाही. हे निर्वासित निर्वासितांचे कॅम्प सोडून आपल्या घरी सुखाने राहू शकतील अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही कारण हे निर्वासित जर त्या छावणीतून गेले तर अराफतांचे नेतृत्व संपेल. अशी परिस्थिती !
हा एक भाग झाला. दुसरा भाग तुमच्यापुढे मांडतो. खेड्याखेड्यांमध्ये आज असंतुष्ट, दु:खी, असमाधानी अशी तरुण माणसं आहेत. ती तरुण पोरं शाळेमध्ये गेली, शहरात गेली, महाविद्यालयात गेली, शिक्षणाबरोबर जी काही पदवी, कागद मिळतो ते घेऊनही आली कदाचित. इंडियात गेली; पण इंडियात प्रवेश मिळाला नाही. इंडियाच्या दर्शनाने डोळे मोठे करून परत आली आणि मग त्यांच्यामध्ये जी तळमळ आहे, ती व्यक्त कशी करायची? असमाधान मुळामध्ये आर्थिक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने सांगितले की, 'अरे हे असं होतं, कारण शेतीमालाला भाव नाही. इथं राहूनच जर कुणाला पोट भरता येत असते तर नोकरी करण्याची काय गरज होती ?' त्यांना ते पटते. दुसरा कोणी गेला आणि त्याला सांगायला लागला, की 'तूला नोकरी मिळाली असती रे; पण हे हरिजन आहेत ना त्यांच्याकरिता आता जागा राखीव ठेवल्या आहेत ना ? ते नालायक असले तरी त्यांना राखीव जागा ठेवल्यामुळे नोकऱ्या मिळतात; पण आपल्या सवर्णांच्या चांगल्या मुलांनासुद्धा मिळत नाहीत.' तो मुलगा विचार करू शकत नाही. त्याला हे दिसत नाही, की सगळ्या देशामध्ये मुळातच नोकऱ्या इतक्या कमी तयार होतात, की त्या सगळ्याच्या सगळ्या सवर्णांना दिल्या तरी सवर्णांची मुलं बेकारची बेकारच राहणार आहेत. कारण शासनाने घेतलेली औद्योगिकीकरणाची भूमिका चुकीची आहे.
पण दारिद्र्याचं कारण काय? गरिबी काढता येत नाही याचा अर्थ काय? कारण काय ? हे त्या मुलाला शेतकरी संघटनेने सांगितलेलं जितकं पटतं, तितकं किंवा दुर्दैवानं कदाचित त्याहीपेक्षा जास्त कोणी जातीयवादी किंवा धार्मिक विचार सांगितला तर पटतो. शेतकरी संघटनेने सांगितलेला विचार समजायला दोन पुस्तकं वाचायला लागतील, थोडंसं तरी समजून घ्यायला लागते. अर्थशास्त्र समजून घ्यायला लागतं; पण एखाद्या क्षुद्रवाद्याने सांगितले, "अरे, तुझा बाप, तुझे पूर्वज, तुझे सगळे पूर्वज हिंदू. आपल्या देशाची परंपरा..." अशी भाषा केली, की काहीसुद्धा विचार न करता आणि काहीसुद्धा न समजता लोकांचे रक्त तापायला लागते आणि लोक अमानुष कृत्य करण्याकरिता तयार होतात.
नुकताच आलेला माझा एक अनुभव सांगतो. मी रेल्वेने प्रवास करीत होतो.