पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहणे, संकटाच्या निर्वर्तनासाठी वेगवेगळे विधी आणि यज्ञयाग करणे याबद्दल हेमाडपंताने जी माहिती दिली आहे ती पाहता त्या वेगळ्या समाजाची किव व समाजधुरीणांविषयी चीड आल्याशिवाय राहत नाही. महादेवारायानंतर त्याचा मुलगा अम्मन हा राजा झाला. पण रामचंद्रदेवाने त्याला कपटाने कैदेत टाकले. एवढेच नव्हे तर त्याचे डोळे काढले आणि राज्य ताब्यात घेतले. रामचंद्राने बनारसपर्यंत स्वाऱ्या केल्या असे म्हटले जात असेल तरी त्याच्या कारकिर्दीपर्यंत इस्लामी आक्रमकांनी पंजाबपासून बंगालपर्यंत व हिमालयापासून विंध्यापर्यंत समग्र भारत व्यापला होता. हे पाहता या बढाईत फारसा अर्थ वाटत नाही.

 अलाउद्दीनचा हल्ला व देवगिरीचा पाडाव

 अशा या यादवांच्या राज्यावर अलाउद्दीन खिलजी ४००० घोडस्वार, २००० पायदळ सैन्य घेऊन चालून आला. पहिल्याच लढाईत रामदेवरायाचा पराभव झाला. त्यानंतर शंकरदेवाचाही पराभव झाला आणि अलाउद्दीन देवगिरीची प्रचंड संपत्ती घेऊन दिल्लीला परतला व त्याने दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले.१३०६ साली मलिक काफूर ३०,००० फौजेसह देवगिरीवर ३ वर्षाच्या खंडणीची थकबाकी वसूल करण्याकरिता आला. लढाई पुन्हा देवगिरीलाच झाली. फिरून पुन्हा यादवांचा पराभव झाला. मलिक काफूर रामदेवाला कैद करून दिल्लीला घेऊन गेला. अलाउद्दीनने त्याला लालछत्र देऊन 'रायेरायान' हा किताब देऊन बरोबर विपुल द्रव्य व गुजराथेतील नवसारी जिल्हा बहाल करून परत पाठवून दिले. मरेपर्यंत रामदेवाने निष्ठावान मांडलिक म्हणून अलाउद्दीनची सेवा केली.

 रामदेवाच्या मृत्यूनंतर शंकरदेव यादव याने पुन्हा एकदा बंड उभारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मलिक काफूर सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला आणि विनासायास देवगिरीला पोचला. युद्धात पुन्हा शंकरदेवाचा पराभव झाला. एवढेच नव्हे स्वत: शंकरदेव ठार झाला.

 अलाउद्दीनच्या मृत्यूची बातमी कळताच मलिक काफूर दिल्लीला पोचला. त्यावेळी रामदेवाचा जावई हरपालदेव याने पुन्हा एकदा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचा नवा बादशहा मुबारक शहा याने एकाच वर्षात आपल्या राज्यात स्थिरता आणली आणि १३१८ मध्ये देवगिरीवर स्वत: चालून आला. पुन्हा एकदा युद्ध देवगिरीच्या आसमंतातच झाले. पुन्हा एकदा हरपालदेवाचा पराभव झाला आणि त्याला हालहाल करून मारण्यात आले. मुबारक शहा देवगिरीस ठाण मांडून राहिला आणि त्याने यादवांचे राज्य फिरून उभे राहून शकणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करून टाकले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८