अर्थवादी चळवळीला 'क्षुद्रवाद्यां'चा धोका
काही वर्षांपूर्वी याच मराठवाड्यात नामांतराचा प्रश्न काही मंडळींनी प्रतिष्ठेचा केला होता. कुणी त्याला अस्मितेचा म्हटलं. अस्मितेचा प्रश्न करणारे पुढारी झाले; पण काही गरीब हरिजनांची राजवाड्यातली घरं जळाली आणि सवर्णांच्याही काही माणसांची घरं जळाली. दोन्ही जातीजमातींमध्ये एक विद्वेषाची भावना तयार झाली. ती आजपर्यंतसुद्धा संपूर्णपणे मिटलेली नाही.
गुजरातला अहमदाबादमध्ये राखीव जागांच्या प्रश्नावरती आंदोलन झालं. महाराष्ट्रातही काही मंडळी राखीव जागांच्या प्रश्नांवरती आंदोलन करायला बघत होती.
विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याने दलितांचा प्रश्न काही कमी होतो असं नाही किंवा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याने कोण्या सवर्णाच्या पोटात दुखायला लागतं असंही नाही. दोघांच्याही दररोजच्या जीवनाशी संबंध नसलेले असे मुद्दे काढले, पेटवले की त्यातून काही व्यक्तींची, काही संघटनांची नेतृत्वं प्रस्थापित होत असतात. याकरिता अशा तऱ्हेचे विषय काढले जातात.
त्याच्या नंतर आंबेडकरांच्याच एका लिखाणावरनं वाद उत्पन्न झाला. 'रिडल्स इन हिंदुइझम' त्यांनी लिहिलं. सरकारने छापलं आणि मग ते छापल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी असं का लिहिलं याच्याबद्दल मोठी चर्चा चालू झाली. मला असं वाटतं, सरकारने हे जर छापलं नसतं तर ज्या लोकांनी आंबेडकरांचे खंडन किंवा समर्थन करायचा प्रयत्न केला त्यांनी 'रिडल्स इन हिंदुइझम'हे कधी वाचलंही नसतं आणि कधी त्यापूर्वी वाचलंही नव्हतं.
पण हा मुद्दा बरा आहे, भावना भडकवायला चांगला आहे आणि भावना भडकवून दिल्या म्हणजे आपले काही अनुयायी नक्की आपल्या बाजूने बांधले जातात अशा जाणिवेतून असे प्रश्न तयार होतात.
आता सलमान रश्दींचा एक प्रश्न निघाला. अमुक एका धर्मग्रंथाबद्दल जर कोणी