पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा रोजचा प्रश्न भाकरीचा असतो. सगळी धडपड भाकरीसाठी असते व जमले तर लोण्याचा गोळा मिळावा यासाठी असते. त्यासाठी माणसं धडपडतात, कष्ट करतात, थोडीफार लाडीलबाडी करतात. अगदी चोरी, दरोडेही घालतात; पण त्याकरिता उठून कुणी दंगेधोपे करत नाही.

 शेतकऱ्यांच्या चळवळी साधारणपणे शांततामय राहतात. अगदी शहरांतील कामगारांचे संपसुद्धा हिंसात्मक झाले तरी त्यात काही कत्तली होत नाहीत.
 कोण कोणत्या धर्मात किंवा जातीत जन्माला आला याला तसे काहीच महत्त्व नसते. प्रत्येक माणसाला आपला धर्म, जात, वंश काय तो सर्वश्रेष्ठ अशी भावना असतेच. आपल्या समाजातील भलेमोठे दोषसुद्धा किरकोळ वाटतात. दुसऱ्या धर्मातील, तुलनेने किरकोळ दोषही असह्य होतात.

 आपल्यातील चौथा हिस्सा लोकांना धर्माने अस्पृश्य ठरवले व स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागवले याचे धर्मनिष्ठ हिंदूंच्या मनात काहीतरी लंबडे बागडे का होईना समर्थन असते. शरियतमधील कालबाह्य झालेल्या कल्पनांचे हर कट्टर मुसलमान काहीतरी समर्थन देतो; पण धार्मिक दंगे प्रामुख्याने शहर वस्तीतच होतात. बिहार, नौखाली येथील दंगे वगळले आणि फाळणीच्या वेळी दोन्ही दिशांनी जाणाऱ्या निर्वासितांची जी कत्तल झाली त्याचा अपवाद केला तर दंगे प्रामुख्याने शहरातच होतात. खेडेगावं वस्तीत सवर्ण-दलित, ठाकूर-दलित असे दंगे होत नाहीत असे नाही. कधी कोणी कोठे उठून गावातील एखाद्या जातीच्या माणसांना झोडपून काढतो, अगदी अनन्वित प्रकारसुद्धा होतो; पण हे फार काळ चालत नाही. फार दूरवर पसरत नाही.

 ग्रामीण भागात होणाऱ्या दंगलीत स्त्रियांची विटंबना क्वचित होते. शहरातील दंग्यांच्या काळात सगळ्यात जास्त अत्याचार स्त्रियांवर होतात.

 दंगे उद्भवले असे वर्तमानपत्रांतल्या बातम्या वाचून वाटते. काही एखाद्या प्रसंगाने ते भडकले अशीही कल्पना होते; पण दंग्याच्या भागातील पोलिसांचा अनुभव लक्षात घेतला तर प्रत्यक्ष हाणामारी सुरू होण्याच्या आधी आठ-दहा दिवस तरी दंग्याची चाहूल अधिकाऱ्यांना लागलेली असते असे दिसते. शस्त्रास्त्रे जमवण्याचा दोन्ही जमातींत प्रयत्न होत असतो. अमक्या एका मिरवणुकीत किंवा तमक्या एका प्रसंगी दंगे उसळणार आहेत अशा चर्चाही संबंधित गटात होत असतात.

 दंगयाच्या आधी काही काळ आणि दंगा चालू असताना सदासर्वकाळ अफवांचे पीक झपाट्याने वाढते. गेल्या वर्षी झालेल्या मीरतच्या दंगलीची सुरुवात मुसलमानांनी केलेल्या अत्याचाराच्या वदंतेने झाली. मीरतच्या दंग्याबद्दल खूप

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १९५