पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





 जातीय दंग्यांचे रसायनशास्त्र


 पुपुण्याच्या दगडू हलवायाच्या गणपतीवर कोणा एकाने घाण फेकली आणि पुण्यात आठवडाभर हिंदू मुसलमान दंगलीचा तणाव तयार झाला. मुरादाबाद येथे १३ ऑगस्ट १९८० रोजी ईदच्या प्रार्थनेच्या वेळी एक डुक्कर मशिदीत घुसले आणि दंगल उसळली. एप्रिल १९७९ मध्ये जमशेदपूरसारख्या औद्योगिक शहरात मशिदीवरून वाजतगाजत मिरवणूक नेण्यावरून दंगलीला सुरुवात झाली.

 दंगली फक्त हिंदू आणि मुसलमानांतच होतात असे नाही. दंगे हिंदू आणि शीख, ख्रिश्चन आणि हिंदू , आदिवासी आणि शाहू, गुरखा विरुद्ध बंगाली, मराठी विरुद्ध कानडी अशा वेगवेगळ्या जमातींतही होतात. महात्मा गांधींच्या हौतात्म्यानंतर देशातील जातीय दंगेधोपे संपतील असे वाटत होते. प्रत्यक्षात दंग्यांची संख्या वाढते आहे आणि नव्या नव्या प्रकारचे दंगे जन्माला येताहेत. जातीय दंगलीत माणसांसारखी माणसे अमानुष क्रौर्य दाखवतात. पंजाबमध्ये बसमधील सगळ्या प्रवाशांना गोळ्या घालून मारणे, भिवंडीच्या दंगलीत सगळी इमारतच्या इमारत आतल्या माणसासहित पेटवून टाकणे, जमशेदपूरच्या दंगलीत प्रवाशांनी भरलेली सगळी बस पेटवून देणे किंवा दिल्लीच्या दंगलीत माणसांना जिवंत जाळणे हे असले प्रकार सर्रास होतात.

 माणसासारखी माणसे, एरव्ही आपल्या-मुलाबाळांवर प्रेम करणारी, त्यांच्याकरिता कष्ट उपसणारी, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी गुण्यागोविंदाने राहणारी एकदम राक्षस कशी बनतात? एका दिवसात आपल्या जातीत किंवा धर्मात अपघाताने जन्मलेल्या सगळ्यांना सज्जन मानू लागतात आणि दुसऱ्या जातीत किंवा धर्मात जन्म झालेल्यांना परके आणि शत्रू मानू लागतात हा काय अजब प्रकार आहे?

 खरे तर कोणाही प्रामाणिक आणि सज्जन माणसाला इच्छा आकांक्षा फार थोड्या असतात. आपण आणि आपल्या कुटुंबातील माणसं सुखरूप राहावी, दैनंदिन जीवन आजच्यापेक्षा उद्या थोडे बरे असावे, संसार धड व्हावा, पोरंबाळं मोठी होऊन मार्गी लागावीत. या पलीकडे जनसामान्यांची काही फार मोठी महत्त्वाकांक्षा नसते.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १९४