पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साधत नाही. ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झालेले, दुष्काळाने ग्रासलेले, रोजगार मिळवायचा म्हटले तरी मिळत नाही. मग उपाशीपोटी मरण्यापेक्षा मुक्त झालेले वेठबिगारसुद्धा नाइलाजाने का होईना, जुन्या मालकांकडे जाऊन कामावर पुन्हा ठेवून घेण्याची विनवणी करू लागतात.

 पण वेठबिगारी म्हणजे कोणा आडरानातल्या एका धनदांडग्या मग्रूर सावकार, जमीनदाराने तयार केलेली खलपुरुषी संस्था नाही. वेठबिगारीचा प्रश्न लग्नाच्या खर्चासाठी कर्जात बुडालेले लग्न गडी आणि सावकार यांच्यातील वैयक्तिक प्रश्न नाही. दोनपाचशे रुपड्यांकरिता माणुसकीला महाग होण्याची वेळ येते, पोटच्या पोरी विकायला आईबाप तयार होतात, लक्षावधी कुटुंबे दुष्काळात जगण्यासाठी शहरांचा आश्रय घ्यायला येतात, अशा व्यवस्थेचा वेठबिगारी हा एक छोटा भाग.

 नाटकाच्या लेखकाचे मत थोडे वेगळे असेल. कदाचित, एखाद्या ऐतिहासिक नाटकातील खलपुरुषाप्रमाणे विक्राळ हसणाऱ्या, सूडबुद्धी सावकारीच्या मानसिक विकृतीतून वेठबिगारीचा उगम होणे अशी त्याची कल्पना असेल; पण तरीही एक वेठबिगार त्या सावकाराचा खून करतो आणि त्याकरिता फाशीवर चढतो. याकरिता त्याला हौतात्म्याचे वलय देणारे नाटक दूरदर्शनने दाखवावे हे मोठे अद्भुत म्हटले पाहिजे.

 आदिवासी वेठबिगारांना लुटणारी सर्वांत मोठी व्यवस्था म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्यावर लादलेली सक्तीची एकाधिकारी खरेदी. सर्व आदिवासींना आपला माल शासनालाच विकावा लागतो आणि या व्यवहारात जिल्हाधिकारी आणि व्यापारी मिळून त्याला अक्षरश: नागवतात. या अन्यायाविरुद्ध आदिवासी हातात काठ्या घेऊन उठतात आणि एखाद्या व्यापाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा खून करतात अशी कथा असलेले नाटक दूरदर्शन दाखवील काय? लक्षावधी शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी शेतीमालाच्या भावासाठी महाप्रचंड ऐतिहासिक आंदोलन केले. गेल्या सात वर्षांत या आदोलनावर आधारलेला एकही कार्यक्रम दूरदर्शनवर चुकूनही झालेला नाही. शेतकरी आंदोलनाची आरती ओवाळणारे नाटक तर सोडाच; पण आंदोलनावर टीका करणारे कार्यक्रमसुद्धा दूरदर्शनने दाखविले नाहीत. अगदी परवा परवा चौधरी चरणसिंगांना श्रद्धांजली वाहण्याकरिता शहरी ग्राहक चवळवळीच्या नेत्यांना दूरदर्शनने बोलावले, शेतकरी आंदोलनातील कार्यकर्त्यांना नाही. शांतता आणि अहिंसात्मक सत्याग्रहावर आधारलेल्या शेतकरी आंदोलनाचे दूरदर्शनला इतके वावडे आहे, तेच दूरदर्शन अप्रच्छन्न हिंसाचारी, ग्रामीण समाजात फूट पाडणाऱ्या किरकोळ आंदोलनाचा उदो उदो करते यात मोठा खोल अर्थ भरलेला आहे.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १९२