शिवपूर्वकालीन राजांचा इतिहास
शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी धरून ज्या गुलामगिरीला जबरदस्त हिमतीने धक्का दिला ती गुलामगिरी मुसलमानी आक्रमणापासून सुरू झाली अशी सर्वसाधारण समजूत आहे.
इ.स.७११ पासून भारतावर मुसलमानी आक्रमकांचे हल्ले झाले तरी महाराष्ट्रावरचे पहिले मुसलमानी आक्रमण इ.स.१२९५ मध्ये अलाउद्दीन खिलजीने केले. तोपर्यंत महाराष्ट्रावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट घराण्यांनी राज्य केले. त्याखेरीज अभीर (खानदेश), त्रैकूट ( नाशिक), शतक्षत्रप (प. महाराष्ट्र ), शिलाहार (कोकण)अशाही काही छोट्या राजवटी ठिकठिकाणी सत्ता गाजवत होत्या.
या काळात देशाची स्थिती कशी होती याची कल्पना काही त्रोटक पुराव्यांच्या आधारे करावी लागते. सातवाहन काळात प्रजा आनंदात जीवन जगत होती, स्त्रियांना भरपूर स्वात्रंत्र्य व प्रतिष्ठा होती, सतीची चाल सुरू झाली नव्हती, वेगवेगळ्या व्यवसायांना सुरूवात झाली होती असे शिलालेख सांगतात.
राष्ट्रकूटांच्या काळात मुसलमान व्यापारी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले, त्यांनी सागरी व्यापारावर ताबा मिळवला, किनारपट्टीवर आरमारी प्रभुत्व कायम केले. राष्ट्रकूटांच्या काळात चातुर्वर्ण्याला विकृत स्वरूप येऊ लागले, सोवळे ओवळे, विधवांचे केशवपन अशा चाली रूढ होऊ लागल्या असे दिसते.
यादव राज्याची सुरूवात नाशिक जिल्ह्यात झाली. ११८७ मध्ये देवगिरीची स्थापना झाली. कोकणातील शिलाहारांचे राज्य पूर्णत: नष्ट करून महादेवराय यादव याने कोकणावर ताबा बसवला. या घराण्यातील वेगवेगळ्या राजांनी स्वत:लाच ज्या पदव्या लावून घेतल्या आहेत त्या पाहता त्यांचा पराक्रम नाही, तरी महत्त्वाकांक्षा दिसून येते 'सपस्त भुवनाश्रय' , 'पृथ्वीवल्लभ', 'सकलपृथ्वी आश्रय', 'राजाधिराज' वगैरे. प्रसिद्ध हेमाडपंडित हा महादेवरायाच्याच दरबारात होता. त्याच्या 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा ग्रंथ पाहिला म्हणजे तत्कालीन समाजाची काही कल्पना येते. अगदी क्षुल्लक व किरकोळ गोष्टीतही मुहूर्त आणि शुभाशुभ