पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि चिंतेने रेडिओ लावला. महेंद्रसिंग टिकैत आणि मी सकाळीच संयुक्त पत्रक काढले होते. दंगा करणारे हिंदू नाहीत, मुसलमान नाहीत केवळ पशू आहेत असे या पत्रकात म्हटले होते. एवढेच नव्हे तर मीरतच्या आसपास उभे राहत असलेले शेतकरी आंदोलन निष्प्रभ करण्याच्या हेतूने शासनाने मीरतमध्ये दंगे घडवून आणले असावेत अशी शंकाही व्यक्त केली होती. उत्तर प्रदेश शेतकरी संघटना दंगाग्रस्त मीरत शहराला दूध आणि भाजी यांचा पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याची घोषणा केली होती.

 रेडिओवर अर्थातच या पत्रकाचा उल्लेख नव्हता. ज्यांच्या एका हाकेसरशी लक्षावधी शेतकरी जमतात, त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न आकाशवाणीच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते यात मलाही आश्चर्य वाटले नाही. दंग्याची परिस्थिती पाहता उत्तर प्रदेशातील चोवीस जिल्ह्यांत सर्व सभांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांच्या नियोजित दौऱ्यातील सभा हाणून पाडण्याकरिता घातली होती, हे सर्वांनाच समजले होते आणि सरकारनेही त्यांचा हेतू लपविण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व जिल्ह्यांत सभांवर बंदी घालण्यात आल्याच्या बातमीतील शेवटचे वाक्य काय असावे? शेवटचे वाक्य होते, ही बंदी धार्मिक सभांना मात्र लागू नाही. धार्मिक दंग्यांनी होरपळून निघणाऱ्या उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली, व्ही.पी. सिंग यांच्या सभांवर. बंदी घालण्यात आली सत्तावीस तारखेच्या ठरलेल्या भारतीय किसान युनियनच्या मेळाव्यावर; पण धार्मिक सभांना बंदी नाही.

 मीरतच्या दंगलीची वर्णने देताना नेहमीप्रमाणे कोणत्या जमातीची किती माणसे मेली किंवा जखमी झाली याचा तपशील सांगण्यात आला नाही. असा तपशील सांगितला तर जातीजमातींत वैमनस्य वाढण्याचा धोका म्हणून मृतांचा आणि जखमीचा एकूण आकडाच सांगितला जातो. दंग्यांविषयीच्या बातम्याचा शेवट झाला तो मात्र असा, की सर्व दंगे मुसलमानांनीच घडवून आणले. यामागे प्रचंड कटकारस्थान आहे. परकीय षड्यंत्राचा हात आहे अशी भावना निर्माण व्हावी, घबराट उडावी आणि जातीजातींतील द्वेष वाढावा, एवढेच नव्हे तर पसरावा. बातमीत म्हटले होते, मीरत शहरातील अनेक छाप्यात पाकिस्तानी बनावटीची हत्यारे, दारूगोळा पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.

 हे वाक्य त्या दिवशीच्या बातम्यांत आकाशवाणीच्या कुणा अधिकाऱ्याच्या गफलतीने आलेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे; पण जवळजवळ दोन आठवडे मीरतमध्ये सशस्त्र दलाच्या सैनिकांनी हैदोस घातला, मेलेले आणि

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १९०