पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातीवाल्याला मते द्या, महाराला देऊ नका.' असली भाषा देशभर एकात्मतेच्या आणि अखंडतेच्या गप्पा मारणारे करत आहेत. मी शंकरराव चव्हाण आणि राजीव गांधी या दोघांनाही विनंती करतो, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्त ताकीद द्यावी. एक पोटनिवडणूक जिंकण्याच्या मोहाखातर देश फोडू शकणाऱ्या आणखी एका वादाला त्यांनी खतपाणी घालू नये.

 शेतकरी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, या जातीयवादी प्रचाराला बळी पडू नका. जो शेतकरी जातीच्या कारणाकरिता मते देईल तो शेतकरी संघटनेचाही घात करेल आणि स्वत:चाही घात केल्याशिवाय राहणार नाही.

 या निवडणुकीत माझी काय अपेक्षा आहे? काय जिंकायचे आहे? ज्या दिवशी ह्या निवडणुकीतील भूमिका आम्ही ठरविली त्या दिवशी आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. राजवाड्यांत आणि गावठाणात कोंडले गेलेले हजारो कार्यकर्ते एकत्र आले आहेत. निवडणुकीच्या या निमित्ताने त्या भिंती तोडून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून महिनाभर फिरले तरी मला पुरे. हजारो वर्षांच्या या भिंती आम्ही दूर करू शकलो, राजवाडा आणि गावठाण एकत्र झाले तर आमचा विजय निश्चित आहे. निवडणुकीत जय मिळाला तर हजारो वर्षांच्या पापराशींचा नाश करण्याच्या शुभकार्याचा मंगल प्रारंभ झाला असे मी म्हणेन; पण कोणत्याही परिस्थितीत या ऐक्यानंतर मिळणारे यश आज यायचे, की काही काळानंतर यायचे, एवढाच प्रश्न शिल्लक राहतो. गरिबांची लढाई प्रभावी करण्यासाठी आज एकाच घोषणेची आवश्यकता आहे. आम्ही सर्वांनी एक घोषणा करायची गरज आहे, 'आज या दिवशी आमच्या जाती जळून गेल्या, राख झाल्या.'

 मी मते मागत नाही. या निवडणुकीतील संघटनेची भूमिका आपल्यापुढे मांडली. गरिबीचे आंदोलन फुटून जाऊ नये आणि यशस्वी व्हावे याकरिता काय करावे हे सांगितले. आता शेवटचे एकच वाक्य. या कसोटीच्या काळात असे वागा, की ज्यामुळे तुमच्यावरच पश्चात्तापाची पाळी येऊ नये.

 (नांदेड लोकसभा पोटनिवडणुक, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ केलेले भाषण, २९ फेब्रुवारी १९८७)


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८८