पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निवडणुकीच्या प्रचारसभांत मोठी गमतीची धुळवड चालते. कोणीही काहीही बोलावे, चिखलफेक करावी. सगळे काही चालून जाते. भरपूर हशा आणि टाळ्या सभेत मिळतात. सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, अशा तऱ्हेचा स्वस्त चिखलफेकी प्रचार करण्याच्या मोहापासन त्यांनी अगदी कटाक्षाने दूर राहावे. ही निवडणूक शंकररावांचा पराभव करण्याकरिता नाही, त्यांचा कोण उमेदवार असेल त्याचा पराभव करण्याकरिता नाही. आंदोलनापुढील एक मोठे संकट दूर करण्याकरिता या निवडणुकीचा उपयोग आहे.

 एका बाजूला गरिबांना लुटणाऱ्या लोकांची ताकद फार प्रचंड वाढली आहे. दिल्लीचे सरकार, पंतप्रधानांची सर्व दोस्तमंडळी व खुद्द पंतप्रधानही गरिबांना लुटणाऱ्यांचे साथीदार बनले आहेत. राज्यशासन आणि शेतकरी संघटना कापसाच्या भावासंबंधी संयुक्तपणे केंद्र शासनाकडे प्रयत्न करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. संघटनेचे खरे युद्ध केंद्रसत्तेविरुद्ध चालू आहे. राज्य शासनाच्या हाती शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर काहीच सत्ता नाही. त्यांचं आमचं भांडण लागतं ते राज्य शासनाकडे पोलिस खाते आहे म्हणून. केंद्र सरकार आंदोलन चोपून काढायला राज्य शासनाचा आणि त्यांच्या पोलिसी दंडुक्याचा उपयोग करते म्हणून त्यांचे अन् आमचे भांडण; पण आमची खरी लढाई केंद्राशीच. कापसाच्या भावाची लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू होते आहे. कारण कापसाच्या भावाची लढाई ही एकाधिकाराविरुद्ध नाही. ती प्रत्यक्ष राजीव गांधींच्या कापड धोरणाविरुद्धची लढाई आहे.

 ज्या कापड धोरणाविरुद्ध आपण लढतो आहोत ते धोरण नीट समजावून घेतले म्हणजे आपल्या आंदोलनावर काय धोका कोसळत आहे हे लक्षात येईल. कोणाचे धोरण चांगले अन् कोणाचे वाईट हे ठरवावे कसे ? महात्मा गांधींनी एक फार मोठा नियम सांगितला. कोणतेही धोरण किंवा कार्यक्रम चांगले की वाईट हे कसं ठरवावं? तुमच्या आयुष्यात तुम्ही आजपर्यंत जो सर्वांत हीन-दीन, भुकेला, कंगाल मनुष्य पाहिला असेल त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करा. तुमच्या धोरणानं किंवा कार्यक्रमानं त्या हीनदीन प्राण्याच्या आयुष्यात सुखाचा एक क्षण जरी येणार असेल तरी ते धोरण, तो कार्यक्रम योग्य आहे असं समजा.

 महात्मा गांधींनी हा नियम सांगितला. मग कापड धोरण चूक की बरोबर कसं ठरवायचं? १९८१ मध्ये कर्नाटकातील निपाणी येथे तंबाखुला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे प्रचंड आंदोलन झाले. एका अर्ध्या तालुक्यातून ४० हजार शेतकरी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसले. हे आंदोलन पुरे २३ दिवस चालले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुंबई - दिल्लीच्या पत्रकारांना घेऊन सात किलोमीटर लांब

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८२