पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रयतेला सूडाचे समाधान असावे. म्हणून परकिय लुटारूंच्या रूपाने विमोचक आला असे वाटले असावे. किमान पक्षी दोन लुटारूंच्या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालण्यात व धारातीर्थी पडण्यात रयतेला स्वारस्य वाटले नसावे.

 महाराष्ट्रामध्ये देवगिरीची यादवांची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता आली याचे एक कारण सर्वच जण 'एकराष्ट्रीयतेचा अभाव' असे देतात. याचे उदाहरण म्हणून या प्रांतातच अनेक छोटी छोटी राज्ये होती, प्रत्येक राजा स्वत:ला 'राजाधिराज', 'पृथ्वी वल्लभ' इ. बिरुदे घेत होता आणि सर्व राजे आपआपसात भांडत होते- ही वस्तुस्थिती मांडली जाते. फुल्यांनी या एकराष्ट्रीयतेच्या अभावाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण केले आहे. त्यातल्या त्यात मोठ्या, प्रभावशाली असणाऱ्या हिंदुधर्मीयांच्या राज्याच्या अंतर्गतही एकराष्ट्रीयत्वाची भावना नव्हती असे सूचित केले आहे.

 "अठरा धान्यांची एकि होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" असा प्रश्न जोतिबांनी विचारला.

 रयतेला आपण राजाच्या राष्ट्राचे आहोत असे वाटत नसेल, रयतेचे अगदी स्वकिय राजांशी असलेले संबंधही रक्त, अश्रू आणि घाम यांनीच भरलेले असतील तर एकराष्ट्रीयत्वाची भावना कशी निर्माण होऊ शकणार?

 'एकमय लोक' या अर्थाचे राष्ट्र मुसलमानपूर्व महाराष्ट्रातही नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते आणि आजही तयार झालेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतीच्या लुटीचे युग सुरू झाल्यापासून एकसंध शेतकऱ्यांच्या, बलुतेदारांच्या हिताचे असे राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न एका लहानशा कालखंडात झाला. या कालखंडाचे नायक होते छत्रपती शिवाजी महाराज.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १६