पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





 आमच्या जाती आज जळून गेल्या, राख झाल्या


 माझ्या भावांनो आणि मायबहिणींनो,

 काही क्षणांपूर्वी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मी नारळ फोडून केला. हा शुभारंभ करण्याचे भाग्य आपण सर्वांनी मला दिलेत याबद्दल मी आपला आभारी आहे. हे मी औपचारिकतेने बोलत नाही. लोकसभेच्या मोठ्या निवडणुकांनाही माझ्या लेखी फारसे महत्त्व नाही. कित्येक निवडणुका आल्या आणि गेल्या. कालचे ऐरे गैरे थोर थोर पुढारी बनले; पण सामान्यांची गरिबी हटली नाही, उलट वाढली. मग अशा निवडणुकांचे काय महत्त्व आहे? आणि आताची निवडणूक तर केवळ पोटनिवडणूक आहे. दिल्लीला राजीव गांधींना भरभक्कम बहुमत मिळालेलेच आहे. गेल्या वेळी शंकरराव चव्हाण यांना नांदेडने निवडून दिले. ते मुख्यमंत्री म्हणून खाली मुंबईला आले आणि ही जागा पुन्हा रिकामी झाली. त्या निवडणुकीत शंकरराव चव्हाणांच्या विरुद्ध जे लढले ते रुमालांनी हात बांधून राज्यकर्त्या पक्षाला शरण गेले आहेत. निवडणुका हा असा पक्षापक्षांनी मांडलेला पोरखेळ आहे आणि तरीदेखील प्रकाश आंबेडकरांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे भाग्य मिळाले असे मी म्हणतो; कारण नांदेडची ही पोटनिवडणूक म्हणजे त्या एका कोणा उमेदवाराला दिल्लीच्या लोकसभेत उरलेल्या दोन-अडीच वर्षांकरीता पाठवणारी निवडणूक नाही. देशाचा इतिहास बदलू शकेल अशी ही निवडणूक ठरणार आहे.

 प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला शेतकरी संघटनेने केवळ पाठिंबा दिलेला आहे असे नाही. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी उभे राहावे अशी विनंती केली त्या वेळी बाळासाहेब हे अकोल्याला होते. मी त्यांना पुण्याहून टेलिफोनवरून ही विनंती कळविली, नंतर प्रत्यक्ष भेटीत या निवडणुकीची भूमिका काय असावी याबद्दल आमच्या दोघांच्याही मनातल्या कल्पना एकसारख्या आहेत हे स्पष्ट झाले. या निर्णयाला सर्व विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला. आता बाळासाहेब हे निवडणूक लढवीत आहेत. ते कोणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून नव्हे किंवा केवळ दलितांचे नेते म्हणून नव्हे, तर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १७९