पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

न थांबता १० सप्टेंबरला हे संमेलन चंडीगड येथे होणार होतं म्हणून ९ तारखेपासूनच संपूर्ण चंडीगढभोवती ५-१० किलोमीटरपर्यंत लष्करी जवानांचा पहारा ठेवण्यात आला होता. चंडीगढमध्ये जाणाऱ्या सर्व बसगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. इतर कोणत्याही वाहनातून शेतकरी आणि शेतकऱ्यासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक माणसास खाली उतरवून परतवून लावत होते. शासनाला भीती वाटली की हे संमेलन झाले तर साऱ्या जगाला कळून चुकेल की पंजाब हा राज्यकर्त्या पक्षाबरोबर नाही की अकाल्यांबरोबरही नाही. खरा पंजाब हा शीख शेतकऱ्यांचा पंजाब आहे आणि तो सगळ्यात जास्त ताकदीने संघटनेमागे उभा आहे. शेतकऱ्यांची आंदोलनं अत्यंत शिस्तीने आणि शांततामाय मार्गाने चालू होती. कुठे काही गडबड गोंधळ नव्हता. धर्म, भाषा असे क्षुद्रवाद नव्हते. ज्या पंजाबमध्ये हिंदूशीख दिवसाढवळ्या रस्त्यावर एकमेकांचे खून पाडत होते त्यावेळी एक लाख हिंदूशीख शेतकरी चंडीगढच्या राजभवनावर निदर्शनं करीत सहा दिवस बसले होते. ही चळवळ पाहिल्यानंतर एक प्रसिद्ध पत्रकार श्री. स्वामीनाथन् अय्यर यांनी असं म्हटलं की, 'पंजाब पेटला आहे असं म्हणतात यावर माझा विश्वासच बसत नाही. पंजाबचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो शेतकरी संघटनेकडे सोपवावा.' मीही त्या वेळी म्हटलं, की 'पंजाबच्या शेतकऱ्याला गव्हाला १९० रु. भाव द्या, एकही शीख शेतकरी अकाल्यांच्या मागे जाणार नाही.' पण त्यांना १९० म्हणजे फार महाग वाटले. त्यांनी १५१ चे १५२ केले. आज देश खरोखर याची किंमत मोजतो आहे. १९० रु. महाग वाटलेले हे लोक देशाच्या अखंडत्वाच्या संरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार झाले आहेत. यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आज हजारो माणसं मरताहेत. अगदी ८२ मध्ये झालेल्या एशियाडपासून शिखांना सरसकट जी अन्याय्य वागणूक देण्यात आली त्याने त्यांच्या मनात दुजाभाव निर्माण झाला. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या राज्यातून जास्तीत जास्त हुतात्मे झाले, ज्या देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी आपली घरे जळताना पाहावी लागली त्या देशात आपल्याला काही स्थान आहे की नाही याची जबरदस्त शंका सर्व शिखांच्या मनात निर्माण झाली आहे.

 देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भयानक हत्येनंतर देशामध्ये ज्या काही दंगली घडल्या त्या पाहिल्यानंतर खुशवंतसिंगसारख्या बुद्धिमान शिखालासुद्धा लिहावेसे वाटते की, १९४७ मध्ये शिखांचे अशा तऱ्हेचं हत्याकांड होताना मी पाकिस्तानात पाहिलं होतं. आज हिंदूस्थानात पाहतो आहे. आमचा हा देश आहे का?'

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १७७