पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ताब्यातील प्रदेश कायमचा ताब्यात घेण्याची आवश्यकता नव्हती. मांडलिक राजांकडून त्यांच्या प्रदेशात केलेल्या लुटीचा एक भाग मिळाला की सर्व जेत्या राजांचे समाधान होत असे. अशा लढाया निरंतर चालत. लक्ष्मी संपादण्याचा सर्वात फायदेशीर मार्ग नांगर चालवणे, बलुतेदारांचे व्यवसाय करणे हा नाही तर तलवार चालवणे हा बनला.

 राजा-रयत परस्पर संबंधांचा काही परिणाम इतिहासात उल्लेखलेल्या मोठ्या राजकीय स्थित्यंतरावर होणे स्वाभाविक आहे. राजा-रयत संबंधात सौहार्द असेल तर त्या संबंधांचा परिणाम आणि राजाविषयी कदाचित त्यातूनच निर्माण होणाऱ्या स्वामिनिष्ठेचा परिणाम म्हणून आपल्या राजाविरुद्धच्या राजकिय स्थित्यंतराला प्रजेचा सक्रिय विरोध होण्यात दिसू शकतो. गनिमी काव्याला अनुकूल भौगोलिक रचनेबरोबरच अनुकूल समाजाचीही तेवढीच आवश्यकता असते. केवळ लुटीचे संबंध असतील तर राजाच्या लढायांबद्दल प्रजा पूर्ण उदासीनही होऊ शकतो. प्रसंगी राजाविरोधीही होऊ शकते. रयत राजा संबंधाचे सूत्र ध्यानात ठेवले तर इतिहासातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.

 महाराष्ट्रातील इजिहासात एतद्देशियांचे राज्य जाऊन मुसलमानी सत्ता येणे, ती स्थिर होणे, मुसलमानी सत्ता जाऊन मराठ्यांची सत्ता येणे मराठ्यांची सत्ता जाऊन इंग्रजांची सत्ता येणे ही तीन स्थित्यंतरे घडली.

 महात्मा फुल्यांच्या काळातच मराठ्यांचे राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य येत होते. 'पेशवाईच्या सावलीत' या लेखामध्ये इतिहासकार शेजवलकरांनी वर्णन केलेल्या गोष्टींचे फुले कदाचित जवळचे साक्षीदार होते. १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या एकेिशियांच्या राज्य टिकवण्याच्या शेवटच्या प्रयत्नाचे फुले साक्षीदार होते.

 "सामाजिक प्रगतीला आणि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रजी राज्य परवडले. नानासाहेब पेशवे जिवंत असले तर ब्राह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे अन्यायी आणि प्रतिगामी राज्य पुन: महाराष्ट्रात आले असते," अशी भीती त्यांना वाटत होती. ( म.जोतिबा फुले- धनंजय किर : पृष्ठ ९१)

 मराठा राज्यातून इंग्रजी राज्य येण्याच्या स्थित्यंतराची अनुभवलेली भावना जोतिबांनी हिंदू राजवट जाऊन मुसमानी राजवट येण्याच्या स्थित्यंतरात पाहिली.

 महात्मा फुल्यांच्या मते सर्वसाधारण रयतेची हीच भावना त्यांच्या जवळच्या गढीत, किल्ल्यावर किंवा राजधानीत राहणाऱ्या स्वदेशबांधव व स्वधर्मीय सरदार, राजाविषयी असावी. मुसलमानी आक्रमकांडून एतद्देशीय राजाच्या पराभवात

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १५