पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसलेल्या निबुद्धांच्या गराड्यात सापडलेली, आपल्या नेतृत्वाखालील देश भयानक वेगाने विनाशाकडे वाहत चालला आहे हे पाहणारी आणि ते थांबविण्यास आपण असमर्थ आहोत या जाणिवेने भयग्रस्त झालेली एक एकाकी, असहाय्य स्त्री दिसते. इतका उत्पात घडविण्याइतकी अफाट शक्ती एका व्यक्तीच्या हाती बहाल करून सर्व दोष पंतप्रधानांच्या माथी मारणे म्हणजे केवळ राजकीय डावपेच आहे. संबंधित लेखकांना हे गांभीर्याने म्हणावयाचे नसेलही.

 २. उलटपक्षी, पंतप्रधान आणि सत्तारूढ पक्षातील विदूषक पंजाबमधील परिस्थितीचे खापर विरोधी पक्षा, अकाली, अतिरेकी, अगदी खलिस्तान्यांच्यासुद्धा माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न करतात, हेही तितकेच चुकीचे आहे. सामाजिक- आर्थिक वास्तवतेवर परिणाम करणारी तशीच एखादी समस्या मुळाशी नसेल तर इतक्या प्रचंड प्रमाणावरील विध्वंस एखादी व्यक्ती किंवा संघटना करू शकणार नाही.

 ३. परीकथा ऐकण्यात रमणाऱ्या बालकाप्रमाणेच कोणत्याही प्रश्नामागे एखादे खलनायकी व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे असा विश्वास ठेवणे आपल्याला पसंत पडते. मग तो खलनायक कधी एखादा रावण, कंस, जीना, इंदिरा, झैलसिंग तर कधी भिंद्रनवाले यांच्या रूपाने जन्माला आलेला असतो ! गोष्टीत खलनायक दूर झाला, की ती समस्या दूर होऊन सगळीकडे आनंदी आनंद होतो. किती सुटसुटीत आणि सोईस्कर ! मग किचकट आर्थिक व सामाजिक कारणांचा विचार करण्याची गरजच उरत नाही आणि शिवाय तसा विचार करणे किती गुंतागुंतीचे आणि गैरसोयीचे असते!

 ४.नोव्हेंबर ८२ पर्यंत पंजाबमध्ये कुठेही जातीय स्वरूपात ध्रुवीकरण झालेले नव्हते हे मी अनुभवले आहे. हे मी ठामपणे म्हणू शकतो. तेथे जातीजातीत अजिबात तणाव नव्हते. बहुधा शहरातच वास्तव्य करून असणारे हिंदू ओबडधोबड, अर्धवट शीख शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखे वागवीत आणि शीख शेतकऱ्यांनाही या शहरी व्यापाऱ्यांच्या खोटेपणा व कपटीपणाबद्दल स्वाभाविक तिरस्कार होता. हरियानातील जाट-लाला संबंध किंवा महाराष्ट्रातील मराठे-ब्राह्मण संबंध यासारखेच पंजाबमधील शीख-हिंदू संबंधांचे स्वरूप होते. संपूर्ण देशभर ग्रामीण शेतकरी आणि शहरी नागरिक यांचे संबंध याच प्रकारचे राहिले आहेत. त्यांचे परस्पर आर्थिक हितसंबंध तत्त्वत: संघर्षात्मकच राहिले आहेत. सामाजिक-राजकीय हेतूंनी बंधनात जखडून ठेवलेली संभाव्य धोकादायक परिस्थिती वेळोवेळी स्फोटक बनते- कधी प्रबळ बिगर- शेतकी समाजास धोका पोहोचतो तेव्हा किंवा कधी शेतकरी वर्गाची

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १६७