पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 पंजाब-कपोलकल्पित आणि वास्तविक


 ध्या पंजाबात सुरू असलेल्या चर्चेत गाजावाजा फार आहे; प्रकाश नगण्य आहे. शासकीय पातळीवर किंवा अतिरेक्यांच्या कारवायांसंबधीच नव्हे, तर एकूणच सारासार विचारसरणीच्या बाबतीत हा बुद्धिमत्तेचा सरळसरळ आणि भयानक पराभव आहे.

 गेली चार वर्षे भारतीय किसान युनियनच्या सहकाऱ्यांबरोबर मी पंजाबमधील सर्व जिल्ह्यांतून फिरलो आहे. पतियाळा येथील सत्याग्रहात, चंडीगढ येथे पंजाबच्या राजभवनावर केलेल्या पिकेटिंगमध्ये, गहू रोको आंदोलनात मी हजारो शीख शेतकऱ्यांबरोबर भाग घेतला. या पंजाबी शेतकऱ्यांबरोबर फिरताना पंजाबमधील वास्तव परिस्थिती पारदर्शी स्फटिकातून दिसावी इतक्या स्वच्छपणे मी पाहिली आहे. त्यामुळे पंजाबमधील सद्य:स्थितीवर वर्तमानपत्रांतील तथाकथित अभ्यासपूर्ण लेख वाचताना मी गोंधळून जातो; प्रत्येकजण मी पाहिलेल्या पंजाबशी काडीचेही साम्य नसलेल्या एखाद्या कपोलकल्पित प्रदेशाबाद्दल बोलत आहे असे भासते.

 वास्तवापासून अशा तऱ्हेने घेतलेली फारकत ही येऊ घातलेल्या भयानक आपत्तीची पूर्वसूचनाच आहे. अजून पूर्णपणे वाईट घडून गेलेले नाही; पण देशातील विचार आजच्याच पद्धतीने चालू राहिले तर याहूनही भयंकर आपत्ती या देशावर कोसळतील- केवळ पंजाबमध्येच नाही तर त्यापाठोपाठच इतर काही राज्यांत! उरलेल्या राज्यांत त्यांचा प्रादुर्भाव व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

 पंजाबमधील परिस्थितीबाबत माझे विचार मांडणे क्रमप्राप्त आहे.

 १. शासनाने आणि विशेषत: पंतप्रधानांनी आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून पंजाबचा प्रश्न भडकविला आहे असे काही लोकांचे आग्रही म्हणणे आहे. त्यांच्या मते, पंतप्रधान या भयानक चेटकिणीप्रमाणे असून त्या आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या अद्भुत मंत्र आणि क्रूर तंत्रांच्या साहाय्याने काहीही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, या म्हणण्याइतकं सत्यापासून ढळणारं काही असू शकत नाही. मला तर पंतप्रधानांच्या जागी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १६६