पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गावातल्या गावात दोन खानदानांचे पिढ्यान् पिढ्या वैर असते. पोळ्याच्या पताकेखालून कोणाचे बैल पहिल्यांदा जायचे यावरून वर्षानुवर्षे डोकी फुटत राहतात. शेती तोट्यात, दुसरा काही व्यवसाय नाही, कर्ज तर प्राण घेऊ म्हणते असे सर्व बाजूंनी घेरल्या गेलल्या माणसाने जगावे कसे? माणूस म्हणून अभिमान तरी कशाचा बाळगायचा? मग आर्थिक-सामाजिक लढाईत पराभूत झालेले शेजाऱ्यावर कुरघोडी करून आपली मान त्यातल्या त्यात उंच ठेवण्याचा प्रयत्न करतात.

 रामजन्मभूमीसारखे प्रश्न वेगळ्या परिस्थितीत सहज सुटू शकतात. वाढत्या संपन्नतेच्या अवस्थेत वेगवेगळे समाज माणुसकी आणि उदारता दाखविण्याच्या मानसिकतेत येऊ शकतात. आजच्या आर्थिक परिस्थितीत हे प्रश्न उभे केले तरी ते सुटणार नाहीत. एक बाजू जिंकली तरी त्याची जखम दुसऱ्या बाजूवर राहणार आहे. आणि कधी ना कधी या जखमा सगळ्या समाजाचे जीवन नासवून टाकणार आहेत.

 या पलीकडे, हे प्रश्न आता उभे केल्याने वैभवाकडे जाण्याची वाटच बंद होणार आहे. वैभवाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या संपन्नतेच्या वेशीतूनच जातो. ही वेसच अडवली जाईल तर गरिबीही हटणार नाही; मग अस्मिता आणि प्रतीकांची फक्त राखच हाती येईल.


 जातीय दंग्यांचे आजचे रूप

 जातीय विद्वेष हा काही आता केवळ आगपाखडू भाषणांचा आणि लिखाणाचा विषय राहिलेला नाही. जातीयवादी आणि जमातवादी, शासनाची भीती न बाळगता ज्या प्रकारची भाषणे करतात त्यांचे त्रोटक अहवाल वाचले तरी धक्का बसतो; पण जमातवादी आता त्या पलीकडे गेले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण जसजसे होत आहे तसतसे समाजचे समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुंड, पुढारी, आर्थिक हितसंबंधी - त्यांची धर्म, जात, कोणतीही असो- नियोजनपूर्वक दंगली आणि कत्तली घडवून आणतात. त्याला पोलिसांचीही साथ मिळते. अशा दंगली सुरू झाल्या, की शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, दलितांचे, स्त्रियांचे आवाज कत्तलीच्या कोलाहलात ऐकू येईनासे होतात.

 हे दंगली घडवून आणणारे खेड्यापाड्यात नसतात, शहरांतून येतात. यांचा मुखवटा आता बदलला आहे; पण शेतकऱ्यांचा हा शत्रू इतिहासात शेतकऱ्याचे घर उजाड करण्याकरिता अनेकदा आला आहे. कधी लुटारूंच्या स्वरूपात आला, कधी भटशाहीच्या स्वरूपात आला, आता इंडियाचा हात म्हणून येतो आहे. या हाताचा बंदोबस्त करण्याची वेळ आजच आहे. जमातवादाच्या विरुद्धचे लढाईचे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १६३