पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बलदंडांची ऐष एवढाच आहे. शेतकऱ्यांना लुटणारे कधी जवळचे, आपल्याच भाषेचे, धर्माचे असतात तर कधी ते दुरून येतात. सगळी धर्मव्यवस्था हीच मुळात शेतकऱ्यांच्या शोषणाच्या उद्देशाने तयार झाली. शेतकऱ्यांना लुटून एकत्र झालेली धनसंपत्ती परमेश्वराच्या धाकाने तरी सुरक्षित राहील या आशेने मोठी मोठी वेगवेगळ्या आकारांची वैभवशाली प्रार्थनामंदिरे उभी राहिली. काही काळ पापपुण्याच्या भीतीने लुटारूंनी मंदिरातील संपत्ती बिनधोक राखली. मंदिरे लुटण्यात, मूर्ती फोडण्यात पाप तर नाहीच; पण हक्काने स्वर्ग मिळवून देणारे पुण्य आहे असे परमेश्वराच्याच नावाने सांगणारा कुणी निघाला असता तर जगभर लुटीचे थैमान घालण्याचा खुलेआम परवाना मिळणार होता आणि तसा तो मिळालाही.

 शतकानुशतके लुटालुटी झाल्या, रक्ताचे पाट वाहिले; पण या सगळ्या लढायांत शेतकऱ्यांना स्वारस्य कधीच वाटले नव्हते. अगदी लढाईची धुमश्चक्री चालू असताना शेतकरी शेतात उभे राहून लढाई पाहत राहत अशी इतिहासाची साक्ष आहे. लढाई जिंको कुणीही, लूट आसमंतातल्या शेतकऱ्यांचीच होणार आहे; जिंको कुणी, हरो कुणी, लुटले जाणार आपणच याची निश्चिती शेतकऱ्यांना होती.

 शेतीचा तलवारीच्या धारेने होणाऱ्या लुटीचा तो काळ संपला. व्यापारी दीडदांडीच्या तराजूने आणि दामदुपटीच्या कर्जाने शेतीची लूट सुरू झाली आणि पहिल्यांदा शेतकरी या लुटीचा सामना करण्यास तयार झाला. त्या वेळेचे एक मोठे विचित्र दृश्य समोर येते आहे. त्याचे परिणाम इतके भयानक नसते, तर या दृश्याने हसूच यायला पाहिजे. शेतकऱ्यांना लुटण्याचा हक्क मिळावा म्हणून एकमेकांच्या कत्तली करणाऱ्यांचेच ऐहिासिक वारसदार, त्या लढायांच्या काळात जे घडले, त्याचा सूड घेण्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांनीच या लुटीच्या नवीन यंत्रणेविरुद्ध उठावे असे मोठ्या आवेशाने म्हणत आहेत.


 जातीय दंग्यांची आजची निमित्ते

 राखीव जागांचा प्रश्न नाही, रोजगाराच्या हक्काचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समाजाच्या दृष्टीने काही प्रतीके महत्त्वाची असतात. गायीचे रक्षण हे अस्मितेचे प्रतीक म्हणून महत्त्वाचेरु पण गाय शेतकऱ्याला खात असली तर केवळ धर्मभावनेच्या आधाराने तिचे रक्षण होणे कठीण आहे. रामजन्मभूमीसारखा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो; पण राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहाला तुंबारा पडून डबके झाले असताना हाच प्रश्न प्राधान्याने उठवणे यात काही अर्थ नाही आणि सद्हेतूही असू शकत नाही.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १६२