पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दलितांना मिळणाऱ्या सोयीसवलतीही त्यांना नाहीत. बहुसंख्याक समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. संशयातून दुरावा तयार होतो आणि त्यातून पुन्हा संशय अशा दुष्टचक्रामुळे दोन समाजांत एक अक्राळविक्राळ दरी सतत रुंदावते आहे.

 भूमिहीन शेतकऱ्याचे आणि छोट्या कारागिरांचे प्रश्न सुटल्याखेरीज सर्वसामान्य मुसलमानाच्या मनातील असुरक्षिततेची आणि कोंडले गेल्याची भावना दूर होणे कठीण आहे. मग तो सहजपणे आर्थिक विकासापेक्षा 'आखिरात' जास्त महत्त्वाची आहे असे निकराने सांगू लागतो. या वातावरणाचा फायदा त्यांचे शहरी पुढारी घेतात. परिणामतः स्वातंत्र्याच्या एखाद्यातरी प्रकाशकिरणाकरिता मनात आक्रंदणाऱ्या मुसलमान मायबहिणीसुद्धा 'शरियत'चे समर्थन करू लागतात. मुस्लिम समाजाचे अर्थकारण करणारा नेता जन्मलाच नाही हे मोठे दुर्दैव आहे.

 दलितांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. हिंदू समाजापासूनची त्यांची फारकत काही बाबतीत थोडीफार कमी तर काही बाबतीत पुष्कळ जास्त. गावच्या वतनदार महाराला चावडीसमोर कमरेत वाकून जावे लागे; पण तोच मुसलमान बनला तर जोडे घालून थेट चावडीपर्यंत जाऊ शके. मीनाक्षीपुरमचा हाच धडा आहे. इस्लामने त्याच्या आश्रयाला आलेल्यांना काही सन्मान दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे बुद्धाला शरण गेलेल्यांना सन्मानाचे भाग्यही मिळाले नाही. दलितांत कुणी मोठा व्यापारी, कारखानदारही नाही. समाजाचे नेतृत्व राजकीय सत्तेच्या काही दलालांकडे आणि राखीव जागेच्या धोरणाचा फायदा मिळालेल्या काही भाग्यवानांकडे. मुस्लिम नेतृत्वाप्रमाणेच दलित नेतृत्वालासुद्धा चिंता आहे ती- दलितत्व संपविण्याची नाही, तर आपले नेतृत्व टिकविण्याची. कोणी समाज दुष्ट आहे म्हणून देश फुटू लागलेला नाही. भारत वैभवाच्या दिशेने झेपावत असता तर आसपासचे देशसुद्धा भारताशी घनिष्ठ आर्थिक-सामाजिक संबंध असावेत म्हणून धडपड करत राहिले असते. युरोपातील देशांप्रमाणे राजकीय सहयोगाचीही अपेक्षा त्यांनी बाळगली असती. आज देशातले गट फुटू पाहत आहेत ते मनातील दुष्टतेमुळे नाही, आर्थिक पीछेहाटीच्या ताणातुळे.


 शेतीची लूट हाच इतिहास

 पण हे लक्षात कोण घेतो? दलितांबद्दल तिरस्कार अनेक सवर्णांच्या मनात मुरलेला आहे. शाळेतल्या प्रत्येक वर्गात शिकवला जाणारा इतिहास हिंदूंच्या मनात मुसलमानांचा द्वेष बिंबवतो तर मुसलमानांच्या मनांत हिंदूंचा. खरे पाहिले तर, सगळ्या इतिहासाचा सारांश म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण आणि त्यातून निघणारी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १६१