स्त्रियांच्या माणूसपणाच्या अधिकाराचा बळी देऊन, राजीव गांधींच्या शासनाने मुल्लामौलवींची मनधरणी केली. कोणत्याही घरातील मोठ्या भावाला छोट्या भावंडाचे कौतुक जास्त होते अशी खंत व चीड असतेच. अल्पसंख्याकांचा अनुनय होतो आहे असा संघटित प्रचार करायला लागले तर बहुसंख्याकांच्या मनातही विद्वेषाची ठिणगी पडायला वेळ लागत नाही. अयोध्येतील राजमन्मभूमीच्या वादामुळे सर्व हिंदूंच्या मनांतील तारा कोठे ना कोठे छेडल्या गेल्या आणि प्रत्येक समाजातील माणसे मोठ्या संख्येने 'आम्ही' आणि 'बाकीचे' असा विचार करू लागली.
'जातीयता' वास्तविक किती?
खरे म्हणजे अशी भावना ही कधी वस्तुस्थितीशी जुळणारी असूच शकत नाही. ज्यू तेवढे हरामखोर अशी बुद्धी एखाद्या हिटलरच्याच डोक्याला शोभते. सर्व समाजातील सुष्टदुष्टांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीत फरक असेल त्यानुसार सुष्टदुष्टांच्या टक्केवारीत काय थोडाफार फरक होईल तो होवो.
मग तरीही देशात अशी फुटाफूट का झाली? कोणी म्हणेल लोकांच्या मनातली देशभक्तीची भावना कमी झाली आहे; पण हे किती खोटे आहे! देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मरणदेखील कवटाळले त्या देशातल्या तरुणांच्या मनातील देशभक्ती एकदम आटून गेली कशी? पाकिस्तानबरोबरच्या लढायांत चार चार वेळा इतर जवानांच्या बरोबरीने लढणारा शीख तरुण सगळ्या 'हिंदूस्थान'बद्दल एकदम एवढ्या चिडीने का बोलू लागला? भारतीय लष्करात परम शौर्य गाजवणारे गुरखे एकदम एवढे नाराज का झाले? मुस्लिम जमातीचा प्रश्न आणि दलितांचा प्रश्न पेटतच का राहिले?
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडविणे खरोखरच बिकट आहे. मुसलमान जमातीचे काही मूठभर नेते शहरात राहतात, व्यापार धंदा करतात आणि त्यांतील काही चांगले धनाढ्यही आहेत; पण सर्वसाधारण मुसलमान दलितांपेक्षाही दलित आहेत. खरे सांगायचे तर त्यांच्यातील अनेकांचे पूर्वज भणंग दारिद्र्यामुळेच धर्मांतराकडे वळले. धर्म बदलल्याने आर्थिक हालाखी संपली नाही; पण इस्लामने थोड्याफार प्रमाणात माणूस म्हणून मान आणि अभिमान दिला. गावातला मुलाणी, छोटा शेतकरी, कारागीर, विणकर, रिक्षावाले आणि छोट्यामोठ्या कारखान्यांत काम करणारा संघटित मजूर हे भारतातील मुसलमानाचे प्रातिनिधिक चित्र आहे.