१९४७ मध्ये जातीयवादाच्या वावटळीची अशीच परिसीमा झाली होती. देशाची फाळणी झाली. एका युगपुरुष महात्म्याची हत्या झाली आणि असे वाटले, की महात्म्याच्या रक्ताची किंमत देऊन तरी जातीयवादाचा भस्मासुर कायमचा गाडला गेला; पण त्या ब्रह्मराक्षसाने ३५ वर्षांच्या आतच पुन्हा डोके वर काढले.
जातीयवादाच्या बीजारोपणाची प्रक्रिया
या जातीयवादी भस्मासुराचा उदय वेगवेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या दिशांनी झाला. मुंबईतील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न अधिकाधिक क्रूर बनला. बेकारीत होरपळणाऱ्या मराठी तरुणांना सगळेच भविष्य काळोखे दिसत होते. शिवाजीचे नाव घेऊन कोणी मद्राशांना काढून लावण्याची द्वेषमोहीम उघडली, त्याचेही त्यांनी स्वागत केले. बेकारांना प्रांत नसतो, जात नसते, धर्म नसतो एवढे भान त्यांना कोठले असायला? मद्राशांविरुद्धची मोहीम आटोपली, मराठी तरुणांची बेकारी कमी झालीच नाही, उलट वाढली.
मग शिवाजीचे नाव घेऊन पुन्हा उत्तर प्रदेशातील भैयांविरुद्ध मोहीम काढण्यात आली, केरळातून मुंबईपर्यंत येऊन नारळ विकून पोट भरणाऱ्या मल्याळीविरुद्ध द्वेषमोहीम काढण्यात आली. राखीव जागांच्या निमित्ताने दलितांवरही आगपाखड करून झाली. गरिबीचे खतपाणी मिळालेल्या देशात द्वेषाचे बियाणे पसरले तर वारेमाप पीक येते हे अनेक चलाखांच्या लक्षात आले.
हे चलाख काही कोण्या एका धर्माचे, एका जातीचे, एका भाषेचे किंवा प्रांताचे नाहीत. सगळ्याच धर्मांत, जातींत, भाषांत आणि प्रांतांत हे चलाख दुष्टबुद्धी निपजतात. देशाच्या विकासाच्या प्रवाहाला तुंबारा पडला, पाणी साचले, शेवाळे आणि घाण जमू लागली, की अशा क्षुद्र किड्यांची वळवळ सुरू होतेच. तुंबारा फोडून प्रवाह मोकळा करून देणे महत्त्वाचे नाही, डबक्यातील अपुऱ्या अन्नकणांसाठी एकमेकांचे कोथळे काढणे महत्त्वाचे आहे असे आक्रोशाने सांगणारे कीटकवीर पुढारी आणि सेनापती बनतात.
१९८१ मध्ये दक्षिणेत मीनाक्षीपुरम् येथे मोठ्या संख्येने दलितांनी धर्मांतर केले. आपल्या धर्मातील कोट्यवधी दलितांचा काय चरितार्थ चालतो याची कधी काळजी न करणाऱ्या धर्ममार्तंडांना धर्म बुडतो का काय अशी मोठी चिंता पडली. काश्मीरचा वाद तर सतत जळतच आहे. याच दशकात पंजाब प्रकरणही पेटले. आसामात शिरणाऱ्या बांग्लादेशी शरणार्थीचा प्रश्न असाच गंभीर बनला. गुरखेदेखील स्वायत्ततेसाठी उठतात का काय अशी धास्ती तयार झाली. शहाबानोप्रकरणी मुस्लिम