पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 प्रास्ताविक


 शेतकरी आंदोलन निर्णायक पायरीवर आले आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असे मानणारा पंतप्रधान देशाला मिळाला आहे. शेतकरी आंदोलनाची सार्थकता नजरेच्या टप्प्यात आली आहे; पण याच वेळी शेतकरी आंदोलन उखडले जाण्याचाही धोका तयार झाला आहे. जातीयवादी आणि धर्मवादी यांचे घनदाट सावट देशभर पसरले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर त्यांना जणू सगळा देशच अर्धाअधिक आपल्या जबड्यात आलाच आहे असा हर्षोन्माद झाला आहे.

 क्षुद्रवाद्यांच्या या धोक्यासंबंधी मी शेतकरी आंदोलनाच्या अगदी पहिल्या कालखंडापासून भाषणांतून, लेखांतून वारंवार धोक्याची सूचना दिलेली आहे. त्योतील काही भाषणे आणि लेख या पुस्तिकेत एकत्र छापलेले आहेत. शेतकरी संघटनेने जातीयवादाच्या भस्मासुराला तोंड देण्यासाठी जी आघाडी उघडली आहे, तिच्या कामी ही पुस्तिका पडावी अशी आशा आहे.

 २ जानेवादी १९९० पासून शेतकरी संघटनेमार्फत फुले-आंबेडकर यात्रा सुरू होत आहे. १९९० हे मोठ्या चमत्कारिक योगायोगाचे साल आहे. १८९० साली म. जोतीबा फुल्यांचे देहावसान झाले आणि त्याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. यावर्षी महाराष्ट्राच्या या दोन समतासंतांची शताब्दी आहे- एकाची स्मृतिशताब्दि, दुसऱ्याची जन्मशताब्दी.

 आणि याच वर्षी सारा देश क्षुद्रवाद्यांच्या कचाट्यात सापडतो की काय अशी भीती तयार झाली आहे.

 १९८७ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी म्हटले होते, की बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीबा फुले यांच्या शताब्दीच्या वर्षी एखादा दलितशोषित देशाचा पंतप्रधान पाहायला मिळावा. आज भीती अशी वाटते, की बहुसंख्यांक धर्माची आणि अल्पसंख्याक जातीची ठोकशाही या वर्षी अवतरते का काय?

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १५८