पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भांडवलनिर्मितीचे महत्त्व आणि कामगाराचे शोषण हेही सामान्य बुद्धीला पटण्यासारखे होते. मार्क्स म्हणजे एक सम्यक् दृष्टिकोन आहे या कल्पनेचीच झिंग इतकी मोठी होती, की 'सब जानता है।' म्हणणाऱ्या ब्रह्मवाद्यापेक्षाही मार्क्सवादी जास्त निष्ठावान कर्मठ बनले.

 आसपासच्या सृष्टीत यच्चयावत् जे काही घडत असेल त्याचा अर्थ मार्क्सवादाच्या संदर्भात लावण्याची विचारवंतांना गोडी लागत गेली. मार्क्सवादी म्हणविणारी एक राज्यसंस्था अस्तित्वात आल्यानंतर मठाधिपतीही तयार झाले. एकामागून एक रशियन शंकराचार्य मार्क्सवादाचा अर्थ लावू लागले. काही वेळा तेच आचार्य परस्पर विरोधी अर्थ सांगू लागले. तरीही सर्व डावे विचारवंत त्यांचे शब्द वंद्य मानून झेलू लागले. या परभृततेपोटीदेखील शेतकरी कामगार पक्षाने मार्क्सवाद जवळ केला असावा.

 अन्यथा मार्क्सवादातील सर्व प्रमुख प्रमेये शेकाप-समाजाच्या अनुभवाशी न जुळणारी आणि विपरीत अशी होती याचे या समाजाला वैषम्य कधीच का वाटले नाही? मार्क्सचे वरकड मूल्याचे विश्लेषण करणारे समीकरण (C+ V + S= W) सर्वस्वी औद्योगिक क्षेत्रावर आधारलेले आहे. शेतीमालाचे उत्पादन कारखानदारीकरिता लागणाऱ्या भांडवलाच्या (C) पोटात गुरफटून टाकण्यात आले हे शेती-समाजाच्या उद्गात्यांच्या काय ध्यानात आले नसेल? मार्क्सवादाची वर्गमीमांसा निदानआपल्या समाजाला लागू नाही असे न समजण्याइतकी ही मंडळी आंधळी नव्हती. सर्व मार्क्सवादी वाङ्मयात आणि समाजवादी देशांत शेतीमालाच्या रास्त भावाविरुद्ध धोरणाचा पुरस्कार केला आहे हे न समजण्याइतकी ती अडाणीही नव्हती. भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये टक्का- दोन टक्केसुद्धा नसलेली कामगार मंडळी क्रांतीचे उद्गाते होतील असली बाष्कळ कल्पना सहज मान्य करण्याचे एरव्ही काहीच कारण नव्हते. शहरांतील नोकरमान्यांच्या जिवावर शेती चालते हा ज्यांचा दररोजचा अनुभव त्यांचा भांडवलनिर्मिती प्रामुख्याने कामगाराच्याच शोषणातून होते यावर क्षणभर तरी विश्वास बसलाच कसा?

 याचा अर्थ असा, की शेकाप-समाजाचे व्यक्तिमत्त्व हेच मुळी दुभंगलेले होते. गावांतील कुणबी शेतकऱ्यांपेक्षा शहरातील नोकरदार मुले आणि त्यांचे हितसंबंधी हेच त्यांना अधिक जवळचे वाटत होते. शेतकऱ्यांना कामगारांच्या चळवळीला जुंपून घेणे हाच त्यांचा खरा उद्देश होता.

 पण शेतीमालाच्या भावाच्या महत्त्वाची जाण शेतकरी कामगार पक्षाच्या गावागावांतील हजारो कार्यकर्त्यांना फार चांगली होती. त्यांच्या आग्रहाखातर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १५५