पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्क्सचे स्थान. जगातील प्रत्येक चलनवलन एका सिद्धांतात गुंफणाऱ्या या विचारपद्धतीने गेल्या शंभर वर्षांतील सर्व तरुण अगदी भारून गेले. समाजातील कोणत्याही अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध बोलायचेच झाले तर मार्क्सवाद हा सहजच संदर्भरेषा म्हणून उभा राहत असे.

 भारतात विद्येच्या परभृततेची प्राचीन परंपरा आहे. पिकते तिथे विकत नाही. इथे ज्ञानेश्वरांनासुद्धा पैठणला जाऊन मान्यता मिळवावी लागते. काशीला जाऊन मिळवली तरच ती विद्या. पुन्हा, विद्या जर जनसामान्यांच्या भाषेत मांडली तर तिला रूप राहत नाही. संस्कृतात किंवा इंग्रजीत ती गोजिरी दिसते. तसेच सोम्यागोम्याच्या हरघडीच्या आयुष्यातल्या प्रश्नांविषयी बोलेल ती कसली विद्या? कुणब्याची शेती विद्या नाही, चांभाराचे शास्त्र नाही. 'आत्मा अमर आहे' ही आमची ज्ञानाची उच्च पराकोटी. उष्ण कटिबंधातील आजारासंबंधी संशोधन करणारी संस्था लंडनला आहे. संस्कृत भाषेचा विशेष अभ्यास करण्यासाठी विद्वान प्राध्यापक जर्मनीत, अमेरिकेत जातात.

 भांडवलदारांच्या आणि पांढरपेशांच्या विश्वातच ही परभृतता असती तर ते समजण्यासारखे होते; पण आमची 'फॉरेन माला' ची 'क्रेझ' या पलीकडची आहे. स्वातंत्र्यलढ्यातील जवळजवळ सर्व राष्ट्रीय नेतृत्व विलायविद्याविभूषितच होते. पंडित नेहरूंची वैयक्तिक लोकप्रियता ही बऱ्याच अंशी मोतीलालजी पॅरिसहून कपडे धुवून आणत या दंतकथेवर आणि इंग्रजांसारख्या गोऱ्या रंगावर अवलंबून होती; पण ही परभृतता अगदी शोषितांच्या आणि दलितांच्या लढ्यातही आढळावी हा प्रकार अद्भुत आहे.

 समाजवादी देशांनी मार्क्सवादी साहित्याच्या प्रचाराचा जो धोशा चालवला आणि त्यांची तळी उचलणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना जो आर्थिक आधार दिला त्यामुळे असेल, शोषित आणि दलितांच्या लढ्याचे परमपीठ युरोपातच मार्क्सच्या आधिपत्याखाली राहिले. जोतीबा फुल्यांचे अर्थशास्त्र दुर्लक्षिले गेले. सत्यशोधक चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीचे स्वरूप येऊन ती निकालात निघाली.शोषितांचा प्रेषित म्हणून मार्क्सने गेली शंभर वर्षे भारताततरी राज्य केले.

 भारतातील शोषणांचा पायाच धर्माधिष्ठित आणि जातीवर बांधलेला होता. जोतीबांनी धर्मांतील शोषण काढून निर्मिकाचा धर्म मांडला. पर्यायी धर्म इलाही असो की जोतीबांचा असो इथे फोफावत नाही. मार्क्सवादाच्या रूपाने चार्वाकानंतर प्रथम निर्भेळ वस्तुवाद अवतरला. विरोधविकासाची कल्पना, मनुष्यजातीच्या समग्र इतिहासाचा नवा दृष्टिकोन यांनी विचारवंतांना एका लाटेत वाहून नेले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १५४