पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण आज बहुसंख्येने हा समाज सत्ताधारी पक्षाच्या जवळ गेला असला, तरी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांपासून वर्चस्व शहरी 'भटशाही'चेच होते. काँग्रेसचा प्रवाह अशा रीतीने पारखा झाल्याने शेतकरी कामगार पक्षाला निवडीचे पर्याय फक्त मार्क्सवाद आणि फुलेवाद असे दोनच होते. शेतकरी कामगार पक्षाने यातील मार्क्सवादाची निवड केली.

 खरे म्हटले तर शेतकरी कामगार पक्षाला आवश्यक तो विचार फुलेवादातून उभा राहू शकला असता. शेतकऱ्यांच्या शोषणाचे जोतीबा फुल्यांनी समग्र आणि विदारक चित्रण केले होते. त्यापुढे जाऊन या सर्व समस्यांचे अगदी मत्स्यावतारापासून अलीकडच्या रावबहाद्दरांपर्यंत इतिहासाचा नवा अन्वयार्थ जोतीबांनी पुढे ठेवला होता. फुले-विचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण समाज एक मानून, त्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या आठ बैलांच्या मालकांच्या दुःस्थितीचे वर्णनही जोतीबांनी समर्थपणे केले होते.

 तरीही फुलेवादाऐवजी शेतकरी कामगार पक्षाला मार्क्सवादच जवळ करावासा वाटला याचे एक कारण असे असू शकते की महात्मा जोतीबा फुले जन्माने सवर्ण नव्हते. माळी समाजातील एका कोणाला, मग तो किती का मोठा असेना, गुरू म्हणून स्वीकारण्याची सवर्ण शेतकऱ्यांच्या मुखंडांची मानसिक तयारी असणे तसे दुरापास्तच होय; पण याहीपेक्षा, मार्क्सवाद जवळचा वाटण्याचे आणखी एक जबरदस्त कारण होते. सवर्ण शेतकऱ्यांची मुले लहानमोठ्या शहरांत थोडीफार शिकून नोकरमानी होऊ लागली होती. कारखान्यांत, गिरण्यांत, गोदीत कामाला लागली होती. त्यांच्या कामाच्या जागी कामगारांच्या संघटना मजबूत होत होत्या. त्या संघटनांचा विचार साहजिकच समाजवादी व साम्यवादी होता. शहरांतून सुट्टीकरिता खेड्यात आलेल्या, तुलनेने शिकलेल्या मुलांच्या तोंडी जो विचार येतो तो त्यांच्या घरची व गावातील माणसे बिचारी भक्तिभावाने मान्य करून टाकतात. नोकरमान्यांच्या तोंडी मार्क्सचा उद्घोष ऐकून मार्क्सवादाला अनुकूल मनोभूमी तयार होणे साहजिकच होते. मार्क्स शेतकऱ्यांच्या प्रश्नाला किती लागून आहे हा विचार फारसा महत्त्वाचा आजही अनेकांना वाटत नाही. त्या काळी वाटला नसावा यात काही आश्चर्य नाही.

 किंबहुना गेली शंभर वर्षे प्रचलित समाजाविरुद्ध आणि व्यवस्थेविरुद्ध जे जे बंड करून उठले त्यांना मार्क्सवाद एकमेव आधार वाटला आहे. पदार्थविज्ञानशास्त्रात कोपर्निकसनंतर न्यूटनचे जसे स्थान आहे तसे समाजशास्त्रात रुसो व्हॉल्टेअरनंतर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १५३